नागपूर : तालुकापातळीवरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीतील जय-पराजयावरून आजी-माजी आमदारांच्या राजकीय ताकदीचे मुल्यमापान होत नसले तरी राजकीय वारे कोणत्या दिशने वाहत आहेत यांचा अंदाज मात्र निश्चित येतो. या पार्श्वभूमीवर विदर्भातील या निवडणुकीचे कल हा महाविकास आघाडीचा उत्साह वाढवणारा व सत्ताधाऱ्यांची काळजी वाढवणारा आहे. राजकीय विरोधकाला शह देण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या अभद्र युत्या हे या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणावे लागेल.

विदर्भात पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यात प्रामुख्याने नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी समर्थित गटांना चांगले यश आले. गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक गट प्रभावी ठरला. शिंदे गटाचे विद्यमान मंत्री संजय राठोड, बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, अमरावतीत माजी मंत्री बच्चू कडू, राणा दाम्पत्य, भाजप खासदार अनिल बोंडे, भंडारा जिल्ह्यात नाना पटोले, चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांना या निवडणुकीत धक्के बसले. सर्वच जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काँग्रेस-भाजप, काँग्रेस-शिंदे गट, भाजप-राष्ट्रवादी, सेना-राष्ट्रवादी अशा अभद्र युती झाल्या. काही ठिकाणी भाजपने शिंदे गटाला दूर सारत काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली.

हेही वाचा – फडणवीस यांच्या सचिवाचा आमदारकीवर डोळा

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देण्यासाठी भाजपशी युती करून लाखनी व सडक अर्जुनीत काँग्रेस समर्थित पॅनलचा पराभव केला. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना रोखण्यासाठी भाजप नेते व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे नेते व माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार एकत्र आले होते. त्यांनी चंद्रपूर, वरोरा, राजुरा बाजर समित्या जिंकल्या. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस नेते सुनील केदार यांची सहकारी संस्थांवर पकड आहे. सातपैकी सहा बाजार समित्यांवर झेंडा फडकावला असला तरी रामटेकमध्ये त्यांनी शिंदे गटाशी केलेली युती मतदारांच्या पचनी पडली नाही. येथे त्यांचा यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्याने पराभव करीत केदारांची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढली.

महाविकास आघाडीला कौल

अमरावती जिल्ह्यात माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमत ठाकूर यांनी भाजपचे राज्यसभा सदस्य अनिल बोंडे व राणा दाम्पत्यांना या निवडणुकीत धुळ चारली. तिवसा, मोर्शी चांदूर रेल्वे, भातकुली बाजार समितीत मविआला यश मिळाले. अमरावती बाजार समितीत आ. राणा यांचे बंधू सुनील राणा यांचा पराभव झाला. वर्धा जिल्ह्यात सेलू बाजार समिती वर्धा, पुलगाव, सेलू बाजार समितीत मविआचे यश आले. यशोमती ठाकूर यांच्या गटाची तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता होती, ती कायम राखण्यात या गटाला यश मिळाले आहे. सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समावेश होऊ शकला नव्हता, बुलढाणा जिल्ह्यात पाचपैकी तीन बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाले आहे.

हेही वाचा – Mann Ki Baat at 100: ‘जन की बात’ कधी करणार? चीन, अदाणी, महागाई, खेळांडूचे आंदोलन यावरून विरोधकांची मोदींवर टीका

खामगावमध्ये अपेक्षेप्रमाणे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने १५ विरुद्ध ३ असा एकतर्फी विजय मिळविला. भाजप आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला धक्का बसला. मलकापूरमध्ये माजी आमदार चैनसुख संचेती व भाजप नेते शिवचंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखालील गटाने १६ जागा पटकावत एकतर्फी सत्ता मिळवली.

गोंदिया जिल्ह्यात आमगाव बाजार समितीत भाजप – राष्ट्रवादी युतीला यश मिळाले, तर गोंदियात या युतीचा पराभव झाला. भाजप समर्थित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी काँग्रेससोबत युती करून १८ पैकी १४ जागांवर यश मिळवले आहे. येथे माजी आमदारद्वय भाजपचे गोपालदास अग्रवाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेन्द्र जैन यांना धक्का बसला.

बुलढाणा जिल्ह्यातील पाचपैकी तीन बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाले आहे. भाजपा-शिंदे गट युतीला दोन ठिकाणी विजय मिळाला. यवतमाळ जिल्ह्यात बाजार समितींच्या निवडणुका प्रस्थापितांना धक्का देणाऱ्या ठरल्या. पालकमंत्री संजय राठोड यांना त्यांच्या दिग्रस या गृह मतदारसंघातील बाजार समितीत पराभवास सामोरे जावे लागले. मात्र त्यांच्या नेतृत्वात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने नेर कृषी उत्पन्न बाजार समिती राखण्यात यश मिळविले. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना हा धक्का आहे.

हेही वाचा – भ्रष्टाचार काँग्रेसचा आणि भाजपचाही… कर्नाटकातील प्रचाराची दिशा बदलली

दिग्रसमध्ये, यवतमाळमध्ये काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बाजार समितीवर एकहाती वर्चस्व मिळविले. पुसद बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वातील मनोहरराव नाईक शेतकरी सहकारी पॅनलने सर्व १८ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले. मनोहर नाईक यांचे पुतणे, भाजपचे आमदार ॲड. निलय नाईक यांच्या नेतृत्वातील पॅनलला पराभवास सामोरे जावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी बाजार समितीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला स्थानिक आघाडीने मात दिली. अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गटासह भाजप एकत्र आले होते. मात्र जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर सहकार गटाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. अकोला बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित आघाडीला अपयश आले.