बुलढाणा : विदर्भातील ‘हॉट सिटी’ म्हणून खामगावची ओळख. या मतदारसंघातील राजकारण आणि समाजकारणदेखील तेवढेच ‘हॉट’ आणि अतिसंवेदनशील. त्यामुळे अगदी ग्रामपंचायत ते विधानसभा निवडणुकीत येथील भाजप-काँग्रेस संघर्ष कळस गाठतो. येथील रणसंग्राम संपूर्ण विदर्भात लक्षवेधी ठरतो. यंदाची लढतदेखील याला अपवाद नाही.

काँग्रेसच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यात हिंदुत्ववादी विचारसरणी रुजविण्यात आणि भाजपचे ‘कमळ’ फुलविण्यात दिवं. पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. भाऊसाहेब आणि काँग्रेस नेते दिलीप सानंदा यांच्यातील राजकीय संघर्ष कायम चर्चेत राहिला. भाऊसाहेबांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार आकाश फुंडकर यांनी या संघर्षाचा वारसा जोपासला. यंदा हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत. सानंदा यांनी मागील लढाईत उतरणे टाळले, आता पाच वर्षांच्या अंतराने ‘ब्रेक के बाद’ ते मैदानात उतरले आहेत.

हेही वाचा : काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका

मागील लढतीतून माघार

सानंदा आणि फुंडकर यांच्यातील थेट सामना नरेंद्र मोदी लाटेतील २०१४ च्या लढतीत झाला. यात फुंडकर यांनी सहज बाजी मारत सानंदांना पराभूत केल्याने ते ‘जायंट किलर’ ठरले! मात्र, २०१९ च्या लढतीत सानंदांनी ऐनवेळी मैदानात उतरणे टाळले! यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक तोंडघशी पडले! ऐनवेळी पक्षाने ज्ञानेश्वर पाटील यांना मैदानात उतरविले. त्यांनी पाऊण लाखाच्या आसपास मते घेत काँग्रेसचा सन्मान राखला, मात्र काँग्रेसला ही जागा गमवावी लागली. यामुळे यंदा भाकर फिरवण्याच्या बेतात असलेल्या काँग्रेसने हा निर्णयच फिरवत सानंदा यांनाच उमेदवारी दिली. सोबतच, शेवटच्या यादीत नाव जाहीर करून सानंदा यांना सूचक इशारादेखील दिला.

मतविभाजन अटळ

मतदारसंघाचा सूक्ष्म अभ्यास झालेले फुंडकर यंदा अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरले आहेत. मागील पाच वर्षांत झालेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू ठरली असून भाजपचे एकसंघ मजबूत संघटन, अनुकूल जातीय समीकरणे याची त्याला जोड आहे. निर्णायक संख्येतील मराठा, माळी, ओबीसी, हिंदुत्ववादी मतांचे पाठबळ त्यांना आहे. याउलट काँग्रेसच्या पारंपरिक मतांवर सानंदांची भिस्त असून त्यांचा प्रचार स्वकेंद्रित असल्याचे चित्र आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बोकाळलेली गटबाजी त्यांना घातक ठरू शकते. वंचित बहुजन आघाडी, बसप आणि अपक्षांमुळे होणारे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन काँग्रेससाठी घातक ठरण्याची चिन्हे आहेत. वंचितमुळे ही लढत तिरंगी वळणावर पोहोचली आहे. भाजप आणि काँग्रेसने सध्या ग्रामीण भागांवर भर दिल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

काँग्रेस आणि भाजप अर्थात महायुती आणि महाविकास आघाडीकडून आक्रमक प्रचार सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. फुंडकर यांच्या विकासाच्या नाऱ्याला कमिशन, टक्केवारीच्या आरोपाने प्रत्युत्तर दिले जात आहे. यात आक्रमकता, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपाची आणि कदाचित समोरासमोर भिडून होणाऱ्या संघर्षाची भर पडू शकते.