अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील प्रसिद्ध राज्यकर्त्या महिलांपैकी एक होत्या. त्यांनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशात भाजपा सरकारकडून तब्बल नऊ महिन्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने या महिन्याच्या अखेरीस त्यांच्या ३०० व्या जयंती समारंभानिमित्त राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

पंतप्रधान मोदींकडून विविध प्रकल्पांचे उद्घाटन

३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदूर मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. तसेच ते दातिया आणि सतना विमानतळांचेदेखील उद्घाटन करतील आणि भोपाळमध्ये ‘महिला सक्षमीकरण महापरिषदेला’ संबोधित करतील. या कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या (SHG) सदस्यांसह, ‘लाडली बहना योजने’च्या लाभार्थी आणि उद्योजक महिलांसह दोन लाखांहून अधिक महिला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०२४ पासून नऊ महिने मध्य प्रदेश सरकारने ही मोहीम राबवली. भाजपाने अनेक शहरांमध्ये राजकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांना मध्य प्रदेशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले आहे. अहिल्याबाई होळकरांची प्रशासकीय प्रतिभा तर आहेच, मात्र त्यांनी अनेक मंदिरांच्या केलेल्या जिर्णोद्धाराने त्या एक सांस्कृतिक प्रतीकदेखील आहेत.

नाटकांपासून कला प्रदर्शनांचे आयोजन

जयंतीनिमित्त कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, मध्य प्रदेशने महेश्वर, चित्रकूट, इंदूर, उज्जैन, ओंकारेश्वर आणि ओरछासारख्या शहरांमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित लोक आणि नृत्य सादरीकरणे आयोजित केली आहेत. त्यांच्या जीवनावर राज्य-प्रायोजित चित्रपट आणि एका पुस्तकालादेखील मंजूरी देण्यात आली आहे. त्यांनी जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांच्या २३४ जलरंग चित्रांचे प्रदर्शन आणि त्यांच्या नावाने प्रकाश आणि ध्वनी शो आयोजित केला आहे. त्यात वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरासह विविध मंदिरांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे, मराठी साहित्य अकादमी अहिल्याबाईंशी संबंधित कागदपत्रांचे भाषांतर करत आहे आणि नर्मदा परिक्रमा मार्गावर त्यांच्या पुतळ्यांचीदेखील योजना आखली जात आहे.

इंदूरमधील अहिल्याबाईंच्या राजवाडा पॅलेसमध्ये नुकतीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत यादव यांनी या मोहिमेशी संबंधित ३,८७६ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांना मंजुरी दिली. तसेच कर्जावर व्याज अनुदान देण्यासाठी त्यांच्या नावावर असणाऱ्या युवा प्रशिक्षण कार्यक्रमालदेखील मंजुरी देण्यात आली होती. अहिल्याबाईंवरील प्रदर्शनांमध्ये महिला कारागीर आणि उद्योजकांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याबरोबरच महिला स्टार्ट-अप धोरणावरही काम सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांचा पुढाकार अन् मध्यप्रदेशमधील भाजपाची रणनीती

मोहन यादव यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. ही संपूर्ण मोहीम त्यांच्या सरकारच्या विकासकामांशी आणि महिला सक्षमीकरणाच्या योजनांशी जोडली आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले मोहन यादव राज्याच्या राजकारणात त्यांचे स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दीर्घकाळ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज सिंह चौहान यांना केंद्रीय मंत्रीपद दिल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांचे नाव पुढे केले होते. हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता.

माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि मध्य प्रदेशच्या राजकीय इतिहासाचे लेखक दीपक तिवारी यांनी असे सांगितले की, अहिल्याबाई होळकर यांनी भारतातील शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केल्याने त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. “इतर मुख्यमंत्र्यांनीही धार्मिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु, या प्रमाणात कार्यक्रमांचे नियोजन पहिल्यांदाच केले जात आहे,” असे तिवारी म्हणाले. “या प्रकारचे राजकारण पूर्वी घडले नव्हते. २००३ मध्ये उमा भारती यांच्याबरोबर साधूंनी पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश केला होता. परंतु सरकारी पातळीवर इतका मोठा धार्मिक उत्सव यापूर्वी कधीही झाला नाही,” असेही ते म्हणाले.

तिवारी यांनी सांगितले की, मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री आहेत जे स्वतः इंदूर जिल्ह्याचे प्रभारीदेखील आहेत. “इंदूर ही राज्याची व्यावसायिक आणि आर्थिक राजधानी आहे. अहिल्याबाईंच्या राजवाडा पॅलेसमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णयदेखील जाणीवपूर्वक घेण्यात आला होता,” असे तिवारी म्हणाले. योगायोगाने इंदूर हे भाजपाचे दिग्गज आणि नगरविकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे मैदान आहे आणि त्यानाच मोहन यादव यांच्यापुर्वी संभाव्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा मानले जात होते.

मुख्यमंत्री मोहन यादव काय म्हणाले?

एका कार्यक्रमात बोलताना मोहन यादव यांनी अहिल्याबाईंच्या मंदिर-जीर्णोद्धाराच्या वारशाचा संबंध मुघलांविरोधाटईल प्रतिकाराशी जोडला. ते म्हणाले, “मुघलांनी आपले देवस्थान नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. मला हे सांगण्यास अजिबात संकोच नाही की, अहिल्याबाई होळकर वगळता, मोठ्या राज्यकर्त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष दिले नाही.” अहिल्याबाई होळकर यांचा जयंती उत्सव राजकीय फायदा मिळवण्यासाठी साजरा केला जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला राज्यातील भाजपा नेते विरोध करतात. ज्येष्ठ भाजपा नेते आणि इंदूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष घनश्याम नरोलिया म्हणाले की, हे कार्यक्रम यादव यांच्या महिला-केंद्रित कामकाजाचा विस्तार आहेत. “सर्व भाजपाशासित राज्यांमध्ये हे उत्सव सुरू राहतील. आम्हाला होळकर यांची कहाणी संपूर्ण भारतभर घेऊन जायची आहे.” असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंदूरमधील स्वयंसेवकसंघाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, भाजपा आणि संघ राजकीय हेतूंसाठी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा वापर करतात, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. सरकार आणि संघाद्वारे त्यांचे सामाजिक आणि धार्मिक योगदान साजरे केले जात आहे. ते म्हणाले, “आम्ही डॉकटर आंबेडकर, विवेकानंद यांसारख्या व्यक्तिमतत्वांचा उत्सव साजरा करतो. मग, संपूर्ण देशाला अहिल्याबाई होळकरांबद्दल का माहिती नसावी? त्या फक्त इंदूरमध्ये राहणाऱ्या राणी नव्हत्या.”