BMC Elections: मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दररोज बदलत्या राजकीय समीकरणांचा आढावा घेणं गरजेचं आहे. व्होट व्हाईब या खाजगी कंपनीच्या सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्ष या शर्यतीत आघाडीवर आहे. मात्र, शिवसेना (उबाठा) गट अजूनही या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. भावनिक संबंध, राजकीय वारसा आणि सध्याच्या नागरी व्यवस्थेविरुद्ध एकूणच असंतोषाची लाट दिसून येते. सर्वेक्षणातून काढलेल्या निष्कर्षांवरून मुंबईकरांमध्ये असंतोषाची भावना वाढत असल्याचे दिसून येत आहे. केवळ निवडून आलेल्या नगरसेवकांच्या दीर्घकाळ अनुपस्थितीमुळेच नाही तर प्रशासकांनी दोन वर्षांहून अधिक काळ ज्या पद्धतीने कारभार चालवला आहे त्याबद्दलही हीच भावना दिसून येते. अनेक नागरिकांनी दुर्लक्षित आणि अकार्यक्षम नागरी रचनेत अडकल्याची भावना व्यक्त केली आहे.

सर्वेक्षणादरम्यान नागरिकांशी संवाद साधला असता कुर्ल्यातील शाळेतील शिक्षिका रुक्मिणी शर्मा म्हणाल्या की, “जबाबदार म्हणून कोणीच नाही. रस्ते बरोबर नाहीत, गटारे तुंबलेली आहेत आणि कोणीही याचा वाली नाही. एकेकाळी आम्ही आमच्या भागातील नगरसेवकांशी थेट संपर्क साधू शकतो होतो, तेव्हाचे दिवस मला आठवतात.”

दरम्यान, शहरात भाजपा, विकास प्रथम अशी कहाणी पुढे नेण्यासाठी त्यांच्या मजबूत संघटनात्मक व्यवस्थेवर आणि राज्य-केंद्र सरकारच्या समन्वयावर अवलंबून आहे. असं असताना सर्वेक्षणातून असेही दिसून येते की, ही एकतर्फी लढाई नाही. विभाजनानंतर दोन्ही शिवसेना संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झालेल्या दिसत आहेत. मात्र, मराठीबहुल परिसरात जिथे बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा अजूनही मोठी आहे, तिथे त्यांना पाठिंबा मिळत आहे. या सर्वेक्षणातून आणखी एक ट्रेंड असा दिसून आला, तो म्हणजे ठाकरे आडनावाचे वजन. आदित्य ठाकरे यांचा संपर्क आणि उद्धव ठाकरे यांचा तळागाळातील लोकांशी असलेला सातत्यपूर्ण संबंध, यामुळे दोन्ही पक्षांचे गट राजकीयदृष्ट्या दुफळी निर्माण झालेलेच दिसतात. “मुंबई बाळासाहेबांची आहे. ते कुटुंब त्यामुळे बोलतं होईल”, असे दादरचे रहिवासी ३८ वर्षीय विनय पवार यांनी म्हटले.

सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे

  • नागरिकांमध्ये असंतोष
  • केवळ विकास नको तर जबाबदारी निभावणारे प्रतिनिधित्व हवे
  • मराठी माणसाच्या भल्याचा विचार करता ठाकरे बंधूंनी एकत्र यावे
  • ठाकरे बंधूंच्या या कथानकाचा फटका शिंदेंना बसू शकतो
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढेही मोठी आव्हानं

विशेष म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या हा‍तमिळवणीच्या कल्पनेला मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिसून येत आहे. दोन्ही पक्षाचे नेते सध्या फक्त वक्तव्य करत असले आणि अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा सुरू झालेली नसली तरी या दोघांनाही मतदारांचं आश्चर्यकारक समर्थन दिसून येते. अनेकांचा असा विश्वास आहे की, शिवसेना पक्षाला उद्धव आणि राज ठाकरे यांची आघाडी पुन्हा वरचा दर्जा देऊ शकतात. मुंबईच्या राजकारणात शिवसेनेचं मध्यवर्ती स्थान तिला परत मिळवून देऊ शकतात, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

पश्चिम उपनगरातील गोरेगाव आणि दक्षिण मुंबईतील गिरगावसारख्या मुंबईतील अनेक ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंच्या समर्थकांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी दोघा ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले आहेत. शिवसेनेचे (उबाठा) मुखपत्र सामनामध्येही म्हटले आहे की, “मराठी माणसाच्या ह्रदयात जे आहे ते घडेल.” असे लिहिताना सामनामध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र बसलेले जुने फोटोदेखील वापरले आहेत. तेव्हा शिवसेना विभाजित नव्हती.

‘सामना’ या मुखपत्रातील उद्धव ाणि राज ठाकरे यांचे जुने छायाचित्र

उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात युती होणार की नाही हे जरी अद्याप अधांतरी असलं तरी त्याचा फटका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसू शकतो. कारण दोघा भावांच्या भावनिक कथेमुळे भाजपाच्या शिंदे नेतृत्वाखालील गटाला शिवसेनेचं विभाजन करण्यावरून रोषाला सामोरं जावं लागू शकतं. शिंदे यांच्या गटाला अधिकृत पाठिंबा असला तरी मतदारांच्या दृष्टीने मात्र या गटाचे अस्तित्व अद्यापही वादातच असल्याचे चित्र आहे. हा असंतोष केवळ पक्षापुरताच नाही, तर तो पद्धतशीर सरसकट आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधित्वाचा अभाव, अपूर्ण नागरी आश्वासने आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये कमतरता, यामुळे बदलाच्या मागणीला एक मोठा प्रवाह निर्माण झाला आहे. या वातावरणात कामगिरी आणि भावनिक प्रामाणिकपणा दोन्हीचा खात्रीपूर्वक दावा करू शकणारा पक्ष अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासाठी मोठं आव्हान असेल ते म्हणजे प्रासंगिक राहणं. सध्याच्या निवडणूक परिस्थितीत त्यांची भूमिका मर्यादित दिसत असली तरी युती आणि लक्ष्यपूर्वक प्रचाराबाबतचे त्यांचे निर्णय हे चुरशीची लढत असलेल्या वॉर्डमध्ये महत्त्वाचे ठरू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रचाराला गती मिळत असताना सर्वेक्षणातून असेही स्पष्ट झाले आहे की, मुंबईकर यावेळी फक्त विकासाच्या मुद्यावर मतदान करणार नाहीत, तर प्रतिष्ठेसाठी, जबाबदारीसाठी आणि नव्या ओळखीसाठी मतदान करणार आहे. भाजपा आपल्या आघाडीचे मतांमध्ये रूपांतर करेल की ठाकरे कुटुंब जुन्या आठवणींना मतांच्या संख्येत रूपांतरित करू शकेल हा मोठा प्रश्न सध्या आहे. यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे २०२५ मधील मुंबई महापालिका निवडणूक मुंबईच्या राजकीय कहाणीतील एक निर्णायक क्षण असेल.