नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विभागीय मेळावा नुकताच नागपुरात पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे अहेरीचे (जिल्हा गडचिरोली)आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पक्षाने भाजपशी युती न करता स्वबळावर लढा, अशी मागणी केली. कालपर्यंत भाजपविषयी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या आत्राम यांचा भाजपविषयी दृष्टिकोण बदलण्यामागे त्यांना धनंजय मुंडे यांच्या जागी मंत्रीपद न मिळणे हे कारण मानले जाते. दुसरीकडे भाजपमुळे भुजबळांना मंत्रीपद मिळाल्याची चर्चा सुरू झाल्याने आत्राम भाजपवर नाराज असल्याचे बोलले जाते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा नागपूरमध्ये पार पडला. मेळाव्यात पूर्व विदर्भातील पक्षाचे आमदार व नेते उपस्थित होते. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी असली तरी, जि.प.,महापालिका निवडणुकीत पक्षाने स्वबळावर लढावे असा सूर कार्यकर्त्यांचा, नेत्यांच्या भाषणाचा होता. मेळाव्यात बोलताना माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी थेट भाजपवरच टीका करीत त्यांच्यासोबत युती करू नका, विधानसभा निवडणुकीत भाजपने मला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले, असा गंभीर आरोप केला. त्यांच्या भाजपवरील संतापामागे त्यांचा मंत्रिमंडळात न झालेला समावेश हे कारण सांगितले जाते. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर अजित पवार गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाला तेव्हा आत्राम यांना मंत्री करण्यात आले होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते व त्यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. या काळात आत्राम आणि फडणवीस यांच्यात मधुर संबंध होते. फडणवीस यांच्या प्रत्येक निर्णयाला आत्राम पाठींबा देत होते. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. महायुतीची पुन्हा सत्ता आली. मात्र यावेळी आत्राम यांना पुन्हा मंत्री करण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज होते. अडिच वर्षानंतर आपल्याला मंत्रिपद मिळणारच आहे, असे ते नागपूरमध्ये माध्यमांना सांगत होते. यावरून त्यांची मंत्री होण्याची इच्छा कायम असल्याचे दिसून येत होते.
मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुन्हा मोर्चेबांधणी
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे मंत्रींंमंडळातील राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर आपली वर्णी लागावी म्हणून आत्राम यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली होती. नागपूरमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलतांना मुंडेंच्या रिक्त जागेवर पक्षाने आपल्याला मंत्री करावे असे सुतोवाचही केले होते. पण अचानक पक्षाने मुंडेंच्या जागी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्री केले. त्यासाठी भाजपने प्रयत्न केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. भुजबळ राष्ट्रवादीचे की भाजपचे मंत्री? अशी चर्चाही रंगली. त्यामुळे खुद्द भुजबळ यांना याबाबत नागपूरमध्ये येऊन खुलासा करावा लागला. असे असले तरी भुजबळांमुळे आपली संधी हुकली, अशी भावना आत्राम यांची झाली असून त्यातूनच त्यांनी भाजपवर आरोप केल्याची चर्चा आहे.