नागपूर: रस्ते विकास क्षेत्रात मगील दहा वर्षात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. विरोधकही त्यांच्या कामाचे, धडाडीचे कौतूक करतात, त्यांना सल्ले किवा सूचना कोणी करीत नाही, तशी हिम्मतही कोणी दाखवत नाही, दाखवली तर त्याचा प्रतिवादही तेवढ्याच भक्कमपणे केला जातो, असे आजवरचे चित्र आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये झालेला गडकरींच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम त्याला अपवाद ठरावा. या कार्यक्रमातील प्रमुख अतिथींनी गडकरींचे कौतूक करतानाच त्यांनी “अतिविकास पर्यावरणाच्या विनाशाचे कारण तर ठरत नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे ” असे प्रतिपादन केले. गडकरींच्याच उपस्थितीत, त्यांच्याच कार्यक्रमात त्यांच्याच खात्याच्या कामाबाबत सौम्यपणे पण सडेतोड शब्दात केलेली सूचना गडकरींसाठी खडेबोल सुनावणारी ठरली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन म्हंटल्यावर सर्वांचे लक्ष त्याकडे असणार हे स्वाभाविक होते. ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ हे पुस्तकाचे नाव असल्याने त्याची चर्चाही होती. संघाचे अखील भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, ज्येष्ठ संपादक विचारक विवेक घळसासी व खुद्द लेखक नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रकाशन सोहोळ्यात कोण काय बोलणार याबाबत उत्सूकता होती.

सर्वच जण गडकरींच्या कार्यकतृत्वाचा गुणगौरव करतील अशी अपेक्षा होती. पण खुद्द गडकरी यांनीच ‘आपली प्रतिमा आपल्या कर्तृत्वापेक्षा १०० पट अधिक मोठी निर्माण झाली’ हे प्रांजळपणे मान्य करून संघ संस्कारातून आपण घडत गेलो, आपल्या राजकीय जीवनात संघाच्यासंस्काराचे मोठे स्थान आहे हे स्पष्ट केले. प्रमुख अतिथी विवेक घळसासी यांंनी मात्र गडकरींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतानाच अत्यंत नम्रपणे पर्यावरणाच्या मुद्यावर खडे बोलही सुनावले. गडकरी रस्ते बांधणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृतडो करावी लागते. त्याचा पर्यावरणावर परिणाम होते. नवी पिढी याबाबत अधिक संवेदनशील आहे, असे सांगतानाच रस्ते विकासासोबत पर्यावरण संवर्धन कसे आवश्क आहे, याकडे लक्ष वेधले..

काय म्हणाले घळसासी?

राष्ट्रीय स्वंसेवक संघाने दिलेल्या पंचसुत्रीचा उल्लेख करीत घळसासी म्हणाले, या पंचसुत्री पैकी चार गुण गडकरींच्या अंगी आहेत. पर्यावरणाविषयी संवेदनशील राहण्याची गरज आहे. रस्ते विकासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. विकास करताना आपण कुठे तरी चुकतो का? याचा विचार करावा लागेल. आजची तरुण पिढी पर्यावरणासंबधी अत्यंत संवेदनशील आहे. त्यांच्याशी नितीन गडकरी यांनी संवाद साधावा. विकास करताना आपण पर्यावरणाच्या विनाशाचे कारण तर ठरत नाही ना याचाही विचार करावा, अशी विनंती घळसासी यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकास कामांसाठी वृक्षतोड

नागपुरात विकाकामांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध होत आहे, काही प्रकरणे न्यायालयातही गेली आहेत. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणाऱ्या नव्या इमारतीसाठी तेथील अनेक डेरेदार मोठे वृक्ष तोडले जाणार आहेत, त्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे, नागपूर मेट्रो टप्पा दोनसाठी वर्धा मार्गावरील अनेक झाडे तोडण्यात आली आहे. रस्ते रुंदीकरणासाठी अशाच प्रकारे रोज कुठे ना कुठे झाडे तोडली जात आहे. याबाबत पर्यावरणवादीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात हळहळ आहे. घळसासी यांनी या सर्वांच्या मनातील तळमळ गडकरींच्या उपस्थितच बोलून दाखवल्याने त्याला महत्व अधिक आहे.