बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल (युनायटेड) पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांनी बुधवारी (१६ ऑगस्ट) अचानक नवी दिल्लीचा दौरा केला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच विरोधी पक्षांच्या आघाडीतील काही नेत्यांची दिल्लीत भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, हा दौरा नियोजित नसल्यामुळे अनेकांची भेट होऊ शकली नाही. नितीश कुमार यांनी मात्र हा राजकीय दौरा नसल्याचे सांगितले. माझ्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, जेडीयू पक्षाचे पाटणा येथील एक नेते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजित केलेला नव्हता. शेवटच्या क्षणी काही नेत्यांना भेटण्यासाठी वेळ मागण्यात आली; मात्र कार्यव्यग्रतेमुळे अनेकांची भेट होऊ शकली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधीही दिल्लीत उपस्थित नव्हते. त्यामुळे या दौऱ्याचे टायमिंग चुकले. पण ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या प्रस्तावित बैठकीआधी नितीश कुमार दिल्लीत गेले, याची चर्चा मात्र नक्कीच होईल.”

विरोधकांच्या इंडिया (Indian National Developmental Inclusive Alliance) आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान मुंबई येथे होणार आहे. या बैठकीत विरोधकांकडून कार्यालयीन पदाधिकारी, आघाडीचा अध्यक्ष व राष्ट्रीय निमंत्रक नेमले जाण्याची शक्यता आहे. तसेच आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कोणते विषय घ्यायचे याची साधारण चर्चा केली जाऊ शकते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, “वाजपेयी आणि माझ्यामध्ये आपुलकीचे संबंध होते. “वाजपेयी प्रधानमंत्री होतील, असा अंदाज सर्वांत आधी मीच व्यक्त केला होता. त्याप्रमाणे ते पंतप्रधान झाले. त्यांची माझ्याप्रति विशेष आपुलकी होती. १९९९ साली जेव्हा एनडीएची स्थापना झाली, तेव्हापासून त्यांचे आणि माझे जवळचे संबंध होते. मी आज फक्त त्यांना वंदन करण्यासाठी समाधिस्थळावर आलो आहे”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली. तसेच दिल्लीत इंडिया आघाडीच्या कोणत्याही नेत्याची भेट घेण्याचे नियोजन नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

बिहारमधील काँग्रेस नेत्याने सांगितले की, नितीश कुमार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या प्रयत्नांना बळी पडायला काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय जनता दल नाही. नितीश कुमार आता इंडिया आघाडीचा घटक आहेत आणि त्यांनी संभ्रमावस्था पसरवण्याऐवजी आघाडी आणखी बळकट कशी होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणखी एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, राहुल गांधी गुरुवार सकाळपर्यंत दिल्लीतच होते; पण त्यानंतर ते हिमाचल प्रदेशला निघून गेले. नितीश कुमार आणि राहुल गांधी यांची भेट का होऊ शकली नाही? याबाबत माहिती नाही.

जेडीयू पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत होणारी इंडिया आघाडीची बैठक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जेडीयूच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, नितीश कुमार यांनी ही आघाडी होण्यासाठी सुरुवातीपासून विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांना इंडिया आघाडीत महत्त्वाचे पद मिळायला हवे, अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीचा दौरा करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, याचा पुनरुच्चार नितीश कुमार यांनी केला. तसेच इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने त्यांच्या युतीसाठी हालचाली सुरू केल्या. पाटणा बैठकीनंतर इंडिया आघाडीने एक भक्कम पर्याय उभा केला. त्यावेळी एनडीए कुठे होती? अशी टीकाही त्यांनी केली.