आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये जोरदार राजकारण होत आहे. ओबीसी समाजाची मते खेचण्यासाठी भाजपा आणि समाजवादी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लखनऊ येथे २ जुलै रोजी दोन ‘अपना दल’ पक्षांनी आयोजित केलेल्या सोनेलाल पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपा आणि समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सोनेलाल पटेल यांनी बसपामधून बाहेर पडून १९९५ साली अपना दल पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्या निधनानंतर पक्षाचे दोन तुकडे पडले आहेत. अपना दल (सोनेलाल) ज्याचे नेतृत्व केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल करतात. तर दुसरा अपना दल (कमेरावादी) या पक्षाचे नेतृत्व सोनेलाल पटेल यांच्या पत्नी क्रिष्णा आणि दुसरी मुलगी पल्लवी पटेल करतात. या दोन्ही दलांनी २ जुलै रोजी सोनेलाल पटेल यांच्या जयंतीनिमित्त लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये सभागृहाची नोंदणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुप्रिया पटेल या केंद्रीय मंत्री असून त्यांचे पती आशिष सिंह पटेल हे उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. तर अपना दल (कमेरावादी) समाजवादी पक्षाचा घटकपक्ष आहे. पल्लवी पटेल यांनी मागच्या वर्षी कौशम्बी जिल्ह्यातील सिराथू विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविली आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांचा पराभव केला. दोन्ही अपना दल पक्षांना ओबीसी प्रवर्गातील कुरमी या समाजाचा मोठा पाठिंबा आहे. पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर, वाराणसी, चंदौली, प्रयागराज, कौशम्बी, प्रतापगड, फतेहपूर, बस्ती, गोंडा, बाहरीच, भदोही आणि सोनभद्रा या जिल्ह्यात अपना दलाचे चांगले वर्चस्व आहे.

हे वाचा >> विरोधकांची ऐक्याची घोषणा; पण उत्तर प्रदेश लोकसभेचे अंकगणित भाजपाच्या बाजूने

द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना पल्लवी पटेल म्हणाल्या की, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे सोनेलाल यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहणार आहेत. डॉ. सोनेलाल पटेल यांच्या राजकीय विचारधारेशी सहमत असलेल्या सर्वच नेत्यांना आम्ही या कार्यक्रमाला बोलावत आहोत.

भाजपाचा घटक पक्ष असलेल्या अपना दल (एस) पक्षाने आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही आमंत्रित केले गेले आहे. भाजपाचा दुसरा घटक पक्ष निषाद पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. अपना दल (एस) हा पक्ष कुरमी आणि इतर ओबीसी समाजाचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा करतो, तर निषाद पक्ष नदीकिनारी राहणाऱ्या कोळी समाजाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करतो. पूर्व, मध्य उत्तर प्रदेश आणि बुंदेलखंडच्या भागात नदीकिनारील भागात निषाद समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.

पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाची मते कोणत्या पक्षाच्या बाजूला वळतात, यावर बरीच गणिते अवलंबून राहणार आहेत. २००१ साली तत्कालीन मुख्यमंत्री राजनाथ सिंह यांनी ओबीसींची संख्या निश्चित करण्यासाठी सामाजिक न्याय समितीची स्थापना केली होती. या समितीने राज्यात ४३.१३ टक्के ओबीसी लोकसंख्या असल्याचे सांगितले होते. ओबीसींच्या पाठबळावर भाजपाने २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला. तसेच २०१४ आणि २०१९ साली लोकसभा निवडणुकीतही त्यांना यश मिळाले. मात्र मागच्या वर्षी काही बिगर यादव ओबीसी नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश घेतल्यामुळे त्यांनाही ओबीसींचा बऱ्यापैकी पाठिंबा मिळाला आहे. समाजवादी पक्षाने स्वतःला दलित आणि ओबीसींचा पक्ष असल्याचे दाखविण्यास सुरूवात केली आहे. रामचरितमानसचा वाद भडकल्यापासून सपाने राज्यात जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी रेटून धरली आहे.

आणखी वाचा >> भाजपाला २०२४ च्या लोकसभेची चिंता; उत्तर प्रदेशमध्ये दर तीन महिन्यांनी लोकसभा मतदारसंघाचा करणार सर्व्हे

दुसरीकडे भाजपाने जातनिहाय जनगणनेबाबत सावध पवित्रा घेतलेला आहे. या मागणीला त्यांनी पाठिंबाही दिलेला नाही आणि विरोधही केला नाही. मागच्या ३० वर्षांपासून भाजपाकडून बिगर यादव ओबीसी समाजामध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. या प्रयत्नातून त्यांना समाजवादी पक्षाच्या यादव – मुस्लिम समीकरणाला छेद द्यायचा होता. ओबीसी मतपेटी कायम राखण्यासाठी भाजपाला अपना दल (एस) आणि निषाद पक्षाला सोबत घेणे गरजेचे आहे. मागच्या वेळेसच्या विधानसभा निवडणुकीत ‘अपना दल’ (एस) कडून १७ उमेदवार निवडणुकीत उतरविण्यात आले होते. त्यापैकी १२ उमेदवारांचा विजय झाला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि समाजवादी पक्षानंतर सर्वाधिक आमदार असणारा अपना दल (एस) तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसह (SBSP) पुन्हा एकदा आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीकडे राजभर, मौर्य आणि कुशवाहा या ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. सध्या त्यांचे सहा आमदार आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला १२ लोकसभा मतदारसंघात एसबीएसपी पक्षाचा लाभ होऊ शकतो.

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले, “सोनेलाल पटेल यांनी समाजसेवा आणि राजकारणात मोठे योगदान दिले आहे. भाजपाला जेव्हा जेव्हा अशा मोठ्या नेत्यांच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येते, तेव्हा तेव्हा पक्षाच्या नेत्यांनी त्याला हजेरी लावलेली आहे. राहिला प्रश्न ओबीसी समाजाच्या मतांचा, तर भाजपाला आता समाजाच्या प्रत्येक घटकाचे मतदान प्राप्त होत आहे. ओबीसी समाजाचाही मोठा पाठिंबा भाजपाला असून भाजपाने ओबीसी नेत्यांना सरकार आणि पक्ष संघटनेत महत्त्वाची पदे देऊ केली आहेत. अनेक पक्षांचा विशिष्ट समाजामध्ये विशेष प्रभाव आहे. असे पक्ष भाजपासोबत एकत्र येऊन काम करत आहेत.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc votes in play bjp and sp to celebrate sonelal patels legacy anupriya patel and pallavi patel face to face kvg
First published on: 29-06-2023 at 18:53 IST