पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवले. या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक पावले उचलली. त्याचेच प्रत्युत्तर म्हणून संतापलेल्या पाकिस्तानने आगपाखड करीत शिमला करारासह इतर द्विपक्षीय करार रद्द करणार असल्याची माहिती दिली. पाकिस्तानने गुरुवारी म्हटले की, ते भारताबरोबरचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा अधिकार वापरेल आणि त्यात शिमला कराराचाही समावेश आहे. १९७१ च्या युद्धानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. हा करार दोन देशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात होते. हा करार काय होता? पाकिस्तान सरकारने नक्की काय म्हटले? त्याविषयी जाणून घेऊ.

१९७१ चे युद्ध

१९४७ पासून पूर्व व पश्चिम पाकिस्तानमधील तणाव वाढत होता आणि १९७१ च्या सुरुवातीस देश युद्धाच्या उंबरठ्यावर होता. २५ मार्च रोजी पाकिस्तानी सैन्याने पूर्वेकडील राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी ऑपरेशन सर्चलाइट सुरू केले. परंतु, या हिंसाचारामुळे या प्रदेशात राष्ट्रवादी भावना भडकल्या. त्यामुळे नागरिक आणि लष्करी जवान पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात गेले. याचदरम्यान मुक्ती वाहिनी हा गट पाकिस्तान सरकारविरुद्ध उदयास आला. पूर्व पाकिस्तानमधील स्थितीमुळे भारतामध्ये पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये निर्वासितांची समस्या वाढत होती. इंदिरा गांधी सरकारने ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलली. त्याबरोबरच मुक्ती वाहिनीला शस्त्रे पुरवून आणि प्रशिक्षण देऊन प्रतिकार चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची सुरुवात ३ डिसेंबर रोजी झाली. पाकिस्तानने आठ भारतीय हवाई तळांवर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले. त्या संध्याकाळी पंतप्रधान इंदिरा गांधींनी जाहीर केले की, हे हवाई हल्ले म्हणजे भारताविरुद्ध युद्धाची घोषणा आहे. ३ डिसेंबर १९७१ नंतर भारतीय वायुसेनेने पूर्व पाकिस्तानात वायुसेनेची विमाने नेस्तनाबूत केली आणि ८ डिसेंबपर्यंत संपूर्ण पूर्व पाकिस्तानाच्या आकाशावर भारतीय वायुसेनेने आपला ताबा मिळवला. हे भारतीय सेनेला मोठ्या प्रमाणात फायद्याचे ठरले. भारतीय सेना पाकिस्तानच्या ठिकाण्यांवर हल्ले करीत असताना वायुसेनेच्या विमानांनी शत्रू ठिकाणांवर बॉम्ब व रॉकेट्सचा मारा करून भारतीय सेनेची मदत केली. विजयाची कोणतीही आशा समोर दिसत नसल्याने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सेनेच्या ९३,००० सैनिकांनी भारतीय सेनेसमोर शरणागती पत्करली. या युद्धात भारतीय सैन्याने अपरिमित शौर्य गाजवून पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले.

शिमला करार काय आहे?

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर हा करार झाला होता. युद्ध संपल्याच्या एक वर्षानंतर २ जुलै १९७२ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती भुट्टो यांनी शिमला करारावर स्वाक्षरी केली. हा करार हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे झाला होता. त्यामुळेच त्याला शिमला करार म्हटले जाते. हा करार भारत आणि पाकिस्तानमधील चांगल्या शेजारी संबंधांसाठीचा आराखडा होता. त्यामध्ये भूतकाळातील संबंधांना बिघडवणारे संघर्ष दोन्ही देश सोडून देतील आणि शांततापूर्ण मार्गाने व परस्पर सहमतीने मतभेद दूर करतील, असे मान्य करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या करारात म्हटले आहे, “दोन्ही देशांमधील कोणत्याही समस्येचे अंतिम निराकरण होईपर्यंत, कुणीही नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलणार नाही आणि शांततापूर्ण संबंध राखण्यासाठी धोकादायक असलेल्या कृतींना टाळतील,” असेही करारात पुढे म्हटले आहे. दोन्ही देशांनी करारांतर्गत सीमेच्या बाजूला असणारे आपले सैन्य मागे घेण्याची आणि एकमेकांच्या राष्ट्रीय एकता, प्रादेशिक अखंडता, राजकीय स्वातंत्र्य व समानतेचा आदर करण्याची प्रतिज्ञा केली. दोन्ही देशांकडून संवाद, टपाल, तार, समुद्र, जमीन, सीमा चौक्या आणि हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठीही पावले उचलण्याचे वचन देण्यात आले. या करारात असेही ठरले की, भारत आणि पाकिस्तान आपले सर्व मुद्दे परस्पर चर्चेने सोडवतील. कोणत्याही तिसऱ्या देशाला किंवा संस्थेला यात हस्तक्षेपाची परवानगी दिली जाणार नाही.