मणिपूरमधील हिंसाचार आणि याच राज्यातील दोन महिलांची नग्न धिंड काढून अत्याच्यार केल्याच्या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद संसदेतही उमटत आहेत. संसदेत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले असून या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. याच मागणीवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

मणिपूरमधील महिलांवर अत्याचार केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधक भाजपावर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील अशांततेवर प्रतिक्रिया द्याला उशीर का केला? असा सवाल केला आहे. तर विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी राजस्थानमधील महिला अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत आहेत.

संसदेच्या परिसरात विरोधकांचे जोरदार आंदोलन

सोमवारी अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या आंदोलनाने झाली. विरोधकांनी संसदेच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मोदी सरकारविरोधात आंदोलन केले. तर भाजपाच्या खासदारांनीदेखील राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, अशी भूमिका घेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

राजस्थानचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांवर टीका

“नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार राजस्थानमध्ये महिलांवर सर्वाधिक बलात्कार झाले आहेत. मागील साडे चार वर्षांत या राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ झालेली आहे. ही एक लाजीरवाणी बाब आहे,” असे म्हणत भाजपा खासदार दिया कुमारी यांनी काँग्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

आजचा दिवसही गोंधळाचा, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

सकाळी विरोध महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करायला गेले, तेव्हा अगोदरच भाजपाचे खासदार तेथे उपस्थित होते. त्यामुळे भाजपाच्या खासदारांनी विरोधकांना आंदोलनासाठी जागा देण्यास नकार दिला. त्यानंतर जुन्या संसद भवन परिसरात विरोधकांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांच्या हातात मोठे बॅनर होते. या बॅनरवर मोदी सरकारचा निषेध करण्यात आला होता. तसेच विरोधकांनी आम्हाला न्याय हवा, नरेंद्र मोदी जवाब दो, कायर नरेंद्र मोदी जवाब दो, अशा घोषणा दिल्या. हे आंदोलन साधारण १० मिनिटे चालले. त्यानंतर मणिपूरच्या मुद्द्यावरून सरकारचा निषेध करण्यासाठी सर्व खासदार आपापल्या सभागृहात गेले.

अधीर रंजन चौधरी यांची मोदींवर सडकून टीका

लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारला घेरले. “मणिपूरमधील स्थिती लक्षात घेता नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यायला हवे. तसे सभागृहात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी,” अशी मागणी चौधरी यांनी केली. तर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी चौधरी यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रल्हाद जोशी बोलत असताना काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

“उत्तर कोणी द्यावे हे तुम्ही ठरवू शकत नाहीत”

या सर्व गोंधळात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या विषयावर नक्कीच चर्चा करू शकता. मात्र तुमच्या चर्चेला, प्रश्नाला कोणी उत्तर द्यावे हे तुम्ही ठरवू शकत नाहीत. संबंधित मंत्री या प्रकरणावर उत्तर देतील,” असे ओम बिर्ला यांनी विरोधकांना उद्देशून सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मणिपूरच्या प्रश्नावर विरोधक गंभीर नाहीत”

केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यास तयार आहे, असेही ओम बिर्ला यांनी सांगितले. तसेच सभागृहाचे नेते राजनाथ सिंह यांनीदेखील विरोधी पक्षातील नेते मणिपूरमधील परिस्थितीवर बोलण्यास गंभीर दिसत नाहीत, असे म्हणत विरोधकांवर टीका केली. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांनी ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेतला. प्रश्नोत्तराच्या तासात एकूण पाच प्रश्नांची संबंधित मंत्र्याने उत्तर दिली. त्यानंतर विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षांनी सभागृह दुपारपर्यंत तहकूब केले होते.