अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे शनिवारी पारपत्र तथा पासपोर्ट कार्यालयचे उद्घाटन करण्यात आले. पण आता या कार्यालयाच्या उद्घाटनावरून जिल्ह्यात राजकारण तापले आहे. कार्यालयाच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे.

रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय असावे, अशी मागणी रायगडकरांकडून सातत्याने केली जात होती. कारण पासपोर्टसाठी रायगडकरांना ठाणे अथवा मुंबईतील पासपोर्ट कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रायगडकरांची ही मागणी मान्य झाली. अलिबाग येथे सुसज्ज पासपोर्ट कार्यालय शनिवारी सुरू करण्यात आले. खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.

हेही वाचा – गुंडाच्या भाजप प्रवेशाची अकोल्यात रंगली चर्चा

मात्र उद्घाटन समारंभानंतर जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. कारण राजकीय पक्षांमध्ये कार्यालयाच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ लागली आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर शेतकरी कामगार पक्षाने पासपोर्ट कार्यालय आमदार जयंत पाटील यांच्याच प्रयत्नांनी सुरू झाल्याचा दावा केला. यासाठी केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ७ जून २०२२ रोजी दिलेल्या पत्राचा दाखला दिला आहे. अलिबाग वडखळ मार्गाच्या मंजुरीसाठी आमदार जयंत पाटील यांनी दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी अलिबागच्या पासपोर्ट कार्यालयासाठी पत्र देण्यात आले होते. त्यामुळे कार्यालयाच्या मंजुरीचे श्रेय आपलेच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी समाजमाध्यमांवर व्यापक प्रसिद्धी मोहीम आणि अलिबाग शहरात बॅनरही लावले आहेत.

दुसरीकडे रायगडचे खासदार सुनील तटकरे हे जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी या संदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्र्याकडे पाठापुरावा केला होता. सुष्मा स्वराज देशाच्या परराष्ट्र मंत्री असताना सर्व लोकसभा मतदारसंघात पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे असा निर्णय झाला होता. त्याची अमंलबजावणी व्हावी आणि अलिबागचे पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे यासाठी तटकरे आग्रही होते. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी मुंबईत तत्कालीन विभागीय पोसपोर्ट अधिकारी राजेश गावंडे आणि तत्कालीन मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरीष अग्रनाल यांची भेट घेतली होती. याच वेळी अलिबाग येथील पोस्ट ऑफीस कार्यालयात पासपोर्ट कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चाही केली होती. यानंतरही दोन वेळा पाठपुरावा करून पासपोर्ट कार्यालय लवकर सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता. या कार्यालयाच्या उद्घाटनाचे श्रेय माझेच असून, कोणी कितीही बॅनर लावले तरी वस्तुस्थिती बदलणार नसल्याचा टोला त्यांनी उद्घाटन समारंभात लगावला.

हेही वाचा – ‘भाजपा-संघाचा नेहरूंना विरोध असला तरी पंतप्रधान मोदी दुसरे नेहरू बनू पाहत आहेत’, ज्येष्ठ पत्रकाराच्या पुस्तकात दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्वाची बाब म्हणजे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनीही पासपोर्ट कार्यालयाचे श्रेय हे खासदार सुनील तटकरे यांचेच असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळेच अलिबाग येथे पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याची जाहीर कबूली दळवी यांनी दिली आहे. तर जिल्हा प्रमुख राजा केणी यांनीही समाजमाध्यमांवर यासंदर्भातील पोस्ट टाकल्या आहेत. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयाच्या श्रेयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे.