बऱ्याच सस्पेन्सनंतर अखेर काँग्रेसने शुक्रवारी (३ मे) उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक जागांवरून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही भावंडे या दोन जागांवर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र, प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला; तर राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अमेठी ही जागा अगदी सुरुवातीपासून काँग्रेसने धरून ठेवली होती. मात्र, आता त्याच जागेवरून काँग्रेसने माघार घेतली आहे.

अमेठीमध्ये काँग्रेसने ६३ वर्षीय किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. किशोरी लाल शर्मा गांधी कुटुंबाचे विश्वासू मानले जातात. अगदी राजीव गांधी होते तेव्हापासून शर्मा गांधी परिवाराबरोबर आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या स्मृती इराणी यांनी अमेठीचे तत्कालीन खासदार राहुल गांधी यांचा पराभव केला आणि या जागेचे प्रतिनिधित्व करणार्‍या त्या तिसर्‍या बिगरकाँग्रेस खासदार ठरल्या. त्याआधी भाजपाने केवळ १९९८ मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला होता. अमेठीतून १९७७ च्या आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत विजयी झालेले जनता पक्षाचे रवींद्र प्रताप सिंहदेखील बिगरकाँग्रेस खासदार होते.

हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?

१४ लोकसभा निवडणुकांत काँग्रेस ११ वेळा विजयी

आजपर्यंत झालेल्या १४ लोकसभा निवडणुकांत अमेठी मतदारसंघातून काँग्रेसने ११ वेळा विजय मिळविला आहे. अमेठीतून विजयी होणारे पहिले काँग्रेसचे उमेदवार विद्याधर वाजपेयी होते. ते १९६७ मध्ये आणि नंतर पुन्हा १९७१ मध्ये निवडून आले. १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांनी पहिल्यांदा या जागेवरून निवडणूक लढवली; पण त्यांचा पराभव झाला. परंतु, १९८० मध्ये संजय यांनी पुन्हा याच जागेवरून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. काही महिन्यांनंतर त्यांचे निधन झाले आणि त्यांचे मोठे बंधू राजीव गांधी यांनी पोटनिवडणुकीत या जागेवरून विजय मिळवला.

राजीव गांधी यांनी अमेठी मतदारसंघ सलग तीन वेळा जिंकला. १९९१ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत आणि १९९६ सालच्या निवडणुकीत गांधी घराण्याचे निष्ठावंत सतीश शर्मा यांनी अमेठी मतदारसंघातून विजय मिळवला. परंतु, १९९८ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

१९९९ च्या निवडणुकीत अमेठीतून माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी निवडून आल्या होत्या. त्यांनी २००४ मध्ये आपला मतदारसंघ बदलला आणि अमेठी ही राहुल गांधींसाठी सोडली. राहुल गांधींनी अमेठीतूनच आपली पहिली लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी २००४, २००९ व २०१४ मध्ये अमेठी मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र, २०१९ मध्ये स्मृती इराणींनी त्यांचा पराभव केला. इराणी यांनी राहुल गांधींना ५५,१२० मतांच्या अंतराने पराभूत केले.

१९८१ च्या निवडणुकीत राजीव गांधींचा विक्रमी विजय

मतांच्या टक्केवारीत अमेठीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. काँग्रेसला आठ निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. राजीव गांधी यांनी १९८१ च्या पोटनिवडणुकीत अमेठीमध्ये विक्रमी विजयाची नोंद केली होती. त्यांना तब्बल ८४.१८ टक्के मते मिळाली होती. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची सर्वांत वाईट कामगिरी दिसून आली. त्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३१.१ टक्के मते मिळाली होती.

अमेठी मतदारसंघाची निर्मिती १९६७ मध्ये झाली. अमेठीत १९८१ मध्ये संजय गांधी आणि १९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या मृत्यूमुळे पोटनिवडणूक झाली. (छायाचित्र-लोकसता डिजिटल टिम)

१९६७ मधील अमेठीच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनसंघ (बीजेएस) यांच्यामधील मतांमध्ये केवळ २.०७ टक्के मतांचे अंतर होते. या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली ही सर्वांत कमी विजयी मते होती. १९७७ मध्ये काँग्रेसने प्रथमच अमेठीची जागा गमावली होती. त्या निवडणुकीत जनता पक्षाने ६०.४७ टक्के मते मिळवीत काँग्रेसला पराभूत केले होते. १९९८ मध्ये झालेल्या पराभवात काँग्रेस आणि भाजपाच्या मतांमध्ये ३.९८ टक्क्यांचे अंतर होते; तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या मतांमध्ये ५.५८ टक्क्यांचे अंतर होते. १९९० पासून अमेठीमध्ये भाजपा हा काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर

लोकसभेत काँग्रेसचे वर्चस्व असले तरी गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये घट झाली आहे. २०१७ व २०२२ या विधानसभा निवडणुकांमध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपाने सर्वाधिक मते मिळवली होती. २०१७ मध्ये भाजपाला ३५.७ टक्के, तर काँग्रेसला २४.४ टक्के मते मिळाली होती. २०२२ मध्ये भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाली. भाजपाला ४१.८ टक्के, समाजवादी पक्ष (सपा) ३५.२ टक्के; तर काँग्रेसला केवळ १४.३ टक्के मते मिळाली होती.

हेही वाचा : लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंहांऐवजी मुलाला तिकीट; कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा परिणाम?

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अमेठीमधील एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. त्या निवडणुकीत भाजपाने तीन आणि सपाने दोन जागा जिंकल्या. २०१७ मध्ये भाजपाला चार जागा आणि सपाला एक जागा मिळाली होती.