प्रशांत देशमुख 

वर्धा जिल्ह्यात शिवसेनेच्या नवनिर्माणाचे प्रयत्न सुरू झाले असून त्याचाच भाग म्हणून ठाण्याचे दिवंगत झुंजार शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झाल्याचा दाखला देणारे जिल्ह्याचे नवे संपर्कप्रमुख बाळा राऊत हे संपर्कप्रमुख म्हणून आले. पण ठाणे महापालिका निवडणुका तोंडावर असताना राऊत हे ठाण्यातून वर्धा जिल्ह्याशी कितपत संपर्क ठेवतील अशी शंका शिवसैनिकांना सतावत आहे. 

तक्रारींच्या वादळात अनंत गुढे यांचे संपर्कप्रमुख हे पद दोन दिवसापूर्वी गेले. आता ठाण्याचे माजी नगरसेवक बाळा राऊत यांची नियुक्ती झाली. मंगळवारी त्यांनी घेतलेल्या पहिल्या बैठकीत गटबाजी खपवून घेतली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले. माझे नेते आनंद दिघे हे बोलण्यापेक्षा कामाला महत्त्व द्यायचे. माझाही तोच पिंड आहे. त्यामुळे जो काम करेल, त्याची दखल घेऊ, असे राऊत यांनी स्पष्ट केले. याच सभेत स्थानिक सेना नेत्यांनी पूर्वसूरींच्या कारभारावर जाहीर ताशेरे ओढल्याने राऊतांचा इशारा दिशा स्पष्ट करणारा ठरतो. 

गत चार वर्षात गुढे यांनी केलेल्या कामावर सतत वाद उसळले होते. विश्रामगृहावर महिन्याभरापूर्वी झालेला तमाशा प्रथम समाजमाध्यमावर व नंतर संघटनेत गाजला.सतत गटबाजी उसळत असल्याने निष्ठावंत सैरभैर झाले होते. कामापेक्षा हुजऱ्यांची चलती असल्याचे ते बोलत. पदांचा व्यापार होत असल्याचे जाहीर आरोप  तर निष्ठावंतांना खजील करणारा ठरत होता. राज्यात अडीच वर्षांपासून पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही स्थानिक नेते विरोधी पक्षात असल्यासारखे बेदखल झाल्याची भावना हाेती. हिंगणघाटच्या एका युवा सैनिकाने थेट जाहीर पत्र लिहून पक्षांतर्गत नाराजीला वाचा फोडली होती. त्याचे दूसऱ्याच दिवशी पद गेले. पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या हिंगणघाटचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी कारभारावर नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडला. पक्षाने मंत्रीपद व महत्त्वाचे उपनेतेपद दिलेले शिंदे पक्ष का सोडतात, याची विचारपूसही झाली नाही. त्यांच्या नंतर अनेक नेत्यांनी पक्ष कार्याशी दुरावाच ठेवला. केव्हाही नियुक्ती व कधीही बरखास्ती, असे चित्र राहिले. जिल्ह्याच्या राजकारणात दखलपात्र राहिलेल्या शिवसेनेचे आसन भाजपने कधी ओढून घेतले, हे सेना नेत्यांना समजलेच नाही. मात्र सेनेशी

शंभर टक्के निष्ठा ठेवणारे लढवय्ये नेते पक्षात कायम आहेत. माजी जिल्हाप्रमुख व मुंबई कार्यालयाशी संपर्कात असणारे रविकांत बालपांडे यांनी राऊतांच्या सभेत गटबाजी सोडल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. त्याचीच री राऊतांनी ओढली. लोकसत्ताशी बोलतांना बालपांडे म्हणाले की काही कारणास्तव पक्षाची प्रतिमा मलिन झाली. सूसूत्रता राहिली नाही. दिवाकर रावते हे जबाबदारी सांभाळत होते तेव्हा संघटनेला असलेले महत्त्व आता कमी झाले आहे. नेते थेट हमरीतुमरीवर येतात. संघटना निष्ठा महत्त्वाची राहिली पाहिजे. पक्षाचे काम करणाऱ्या नेत्याची लोकांपुढे जातांना एक निडर प्रतिमा असली पाहिजे. हेच आपण वरिष्ठांना सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपर्कप्रमुख राऊत हे जिल्ह्यात कितपत लक्ष घालतील,याविषयी शंकेचे काहूर आहे. या नेत्यासमोर ठाण्याच्या  आगामी महानगरपालिका निवडणुकांचे आव्हान आहे. ते वर्धा जिल्ह्यात कितपत वेळ देणार व गटबाजीला कसा आवर घालणार, याचे तूर्तास उत्तर कुणाकडेही नाही. ते कोणत्या स्थानिक नेत्याच्या माध्यमातून काम पाहतील, याचीही उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे. गुढेंनी नेमलेले पदाधिकारी सध्या कायम आहेत. पुढे काय, याच विवंचनेत शिवसैनिक बसले आहे.