दयानंद लिपारे

सत्ता मिळाल्याने आगामी कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे कमळ फुलविण्याची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची योजना असली तरी आधी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत मतभेद दूर करून पक्षाची बांधणी भक्कम करण्याचे राजकीय आव्हान त्यांच्या समोर आहे.जिल्ह्यातील दोन महापालिका क्षेत्रातील दोन ताज्या वादग्रस्त प्रकरणांची याला किनार आहे. कोल्हापूरचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचणाऱ्या तप्त दुर्गांची नाराजी त्यांना दुर्गोत्सवात दूर करावी लागणार आहे. इचलकरंजी महापालिकेत अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांची भाजपशी सलगी वाढत असताना प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोल्हापुरातील भाजपचा प्रभाव घसरणीला लागला. विधानसभेच्या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. तथापि, शिंदे – फडणवीस सरकार पुन्हा सत्तारूढ होण्याच्या आसपास जिल्ह्यातील भाजपची ताकद पुन्हा वाढताना दिसू लागली. धनंजय महाडिक यांना राज्यसभेवर संधी मिळाल्याने हा गट पुन्हा चर्चेत आला.

हेही वाचा : सांगलीत भाजपला यश मिळवून देण्याचे नव्या पालकमंत्र्यांसमोर आव्हान’

संकेत मिलनाचे अन वादाचेही

भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे यांची सलगी अधिकच वाढली. आता तर आवाडे गटाला भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या आठवड्यात चंद्रकांत पाटील इचलकरंजीत आले तेव्हा इचलकरंजी महापालिका निवडणुकीपूर्वी नवी बेरजेची समीकरणे करावी लागतील, असे संकेत देत आवाडे गटाला निवडणुकीत सामावून घ्यावे लागेल, असे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर हे शहरात नव्हते. त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जावे ,विधान परिषदेत संधी द्यावी, असा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्यासमोर स्पष्टपणे बोलून दाखवला. आवाडे – हाळवणकर असा राजकीय संघर्ष इचलकरंजीत तीन विधानसभा निवडणुकीत झाला आहे. दोन ध्रुवावरील दोन टोकं एकत्र आणताना पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. यामुळे इचलकरंजी महापालिका जिंकण्याचे स्वप्न पाहताना मतभेद कसे मिटवले जातील याची जबाबदारी मंत्री पाटील यांना पेलावी लागणार आहे.

कोल्हापुरात धुसफूस

भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांचे कोल्हापुरात व्याख्यान झाले. यावेळी भाजपच्या एका महिला गटाने पक्षाचे प्रदेश सदस्य,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्ष गायत्री राऊत यांच्या विरोधात मंत्री पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. जाधव यांच्याकडून अपमानास्पद वागणूक कशी दिली जात आहे याचा पाढा त्यांनी वाचला. प्रदेशाध्यक्ष , उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत जाधव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरॊप केला आहे. तक्रार करणाऱ्यांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक व पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार सचिन तोडकर यांचा पुढाकार लपून राहिला नाही. विधानपरिषदेवर वर्णी लागावी यासाठी प्रयत्नात असताना महेश जाधव हे दुसऱ्यांदा वादात सापडले आहे. या घटनेननंतर पक्षांतर्गत वाद मिटवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवलेले सत्यजित कदम यांनी पोटनिवडणुकीत जाधव यांची भूमिका प्रामाणिक असल्याचा निर्वाळा दिला. महिला आघाडीच्या सरचिटणीस आसावरी जोगदार यांनी तक्रार करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी जाधव यांची बदनामी केल्याचा खुलासा केलेला असला तरी त्यातून पक्षात सारेकाही आलबेल नाही हेच पुढे आले.

हेही वाचा : विधानसभा निवडणूक : भाजपाच्या प्रचाराला सुरुवात, नरेंद्र मोदी म्हणाले ‘हिमाचल प्रदेश माझे दुसरे घर’

पक्षांतर्गत वादाची दुखरी नस

यापूर्वीही भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते बाबा देसाई यांना आमदारकीची उमेदवारी न मिळाल्याने त्यांचा गट नाराज होता. गतवर्षी कोल्हापूरचे माजी अध्यक्ष संदीप देसाई यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन हाती घड्याळ बांधण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यांची नाराजी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दूर करण्यात आली असली तरी शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपमधील मतभेद आजवर चार भिंतीत लपलेले होते. आता त्याचा बोभाटा होऊ लागला आहे. कोल्हापूर, इचलकरंजी यासारख्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर असताना महानगरीय पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपमधील वादाला तोंड फुटणे हे पक्षाला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. चंद्रकांत पाटील यांनी पूर्वीसारखे कोल्हापूरकडे अधिक वेळ देऊन पक्षीय मतभेद संपुष्टात आणणे रास्त ठरेल असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. त्यामुळे पाटील हे पक्षांतर्गत वादाची ही दुखरी नस कशी दूर करणार हे पाहणे लक्षवेधी ठरावे.