बिहारच्या राजकीय वर्तुळात सध्या तेज प्रताप यादवच्या प्रकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी त्यांचे पुत्र तथा माजी मंत्री तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. लालू प्रसाद यादव यांनी असे करण्यामागे तेज प्रताप यादव यांनी केलेली फेसबुक पोस्ट कारणीभूत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अनुष्का यादव नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध असून १२ वर्षांपासून ते दोघे एकत्र असल्याची माहिती दिली. आता ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करत आहोत, असं त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र, यानंतर काही वेळाने तेज प्रताप यादव यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि त्यांचं फेसबुक हॅक झाल्याचा दावा केला. मात्र, यावरूनच लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगितलं.
तेज प्रताप यादव हे काही दिवसांपूर्वीच मालदीवला गेले होते. यासंदर्भातले त्यांचे चॅट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेज प्रताप यांच्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल झालेल्या पोस्ट आणि चॅट्समुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर भाजपाने याबाबत ट्विट करत या प्रकरणात आणखी भर घातली. तेज प्रताप प्रत्यक्षात अनुष्का यादवसोबत मालदीवमध्ये होते का असा प्रश्न या चॅट्सवरून उपस्थित केला जात आहे. तसंच त्यांच्यासोबत दुसरी महिलाही असू शकते, असेही बोलले जात आहे.
निखिल आनंद यांची पोस्ट
दरम्यान, या पूर्ण प्रकरणात भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय नेते निखिल आनंद यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. निखिल आनंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चॅट्सचे काही स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले की, “हे फेसबुक मेसेंजर चॅट कुठून, कोणाकडून आणि कसे पाठवले गेले किंवा पब्लिक डोमेनमध्ये कसे लीक झाले हे माहीत नाही. याचा अर्थ हा विषय गंभीर आहे. यावरून असे दिसून येते की तेजस्वी यादव यांनी स्वतः तेज प्रताप आणि अनुष्काच्या मालदीव दौऱ्याचे नियोजन केले होते. याचा अर्थ लग्न आधीच झाले आहे आणि मुलाची योजना सुरू आहे.”
आनंद यांनी पुढे असाही आरोप केला की, “संपूर्ण यादव कुटुंबाला परिस्थितीची जाणीव होती आणि तेज प्रताप यांची हकालपट्टी ही पूर्वनियोजित राजकीय रणनीतीचा भाग होती.” त्यांनी अनुष्का यादवच्या सुरक्षिततेबद्दलही प्रश्न उपस्थित केले आणि असा दावा केला की, “जर हे प्रकरण सार्वजनिकरित्या समोर आले नसते तर तिच्या जीवाला धोका असता.” त्यांनी लीक झालेल्या चॅट्सचीदेखील चौकशी करण्याची मागणी केली. निखिल आनंद यांनी तेज प्रतापवर त्यांची पहिली पत्नी ऐश्वर्या राय आणि अनुष्का यादव दोघींनाही फसवल्याचा आरोप केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार अनुष्का यादव ही पाटण्यातील लंगरटोलीची रहिवासी आहे आणि तिचा भाऊ आकाश यादव पूर्वी आरजेडीच्या विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करत होता. आकाश यादवची जागा तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी गगन यादव यांनी घेतल्यानंतर तेज प्रताप आणि पक्ष नेतृत्वात तणाव निर्माण झाला होता.
निखिल आनंद यांनी पोस्टमध्ये असेही लिहिले की, “ही एक मनोरंजक कहाणी आहे, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब सामील आहे. संपूर्ण कुटुंबाला याची माहिती आहे. कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टी करणे हे लालूजींचा कुटुंब नियोजन आणि राजकीय कटाचा भाग आहे. दुसरे म्हणजे एक मोठी अशी शंका उद्भवते की, जर ही बातमी माध्यमांमध्ये आली नसती तर अनुष्काला जगणे कठीण झाले असते किंवा ती जिवंतही नसती. हा देखील गंभीर तपासाचा विषय आहे. हा फेसबुक मेसेंजर स्क्रीनशॉट कुठून, कोणी आणि कसा प्रसिद्ध केला किंवा पाठवला याचीही चौकशी व्हायला हवी.”
दरम्यान, राज्यात निवडणुकीच्या काही दिवस आधीच हे प्रकरण समोर आल्याने याचा परिणाम पक्षप्रतिमेवर कसा होतो याकडे सर्वांचं लक्ष असेल. शिवाय विरोधी पक्ष या प्रकरणाचा वापर लालू यांच्याविरोधात नवे अस्त्र म्हणून करतीलच यात शंका नाही.