Will Congress take action against Shashi Tharoor : काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर हे त्यांच्या अलीकडील परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना दिसून आले. काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखातूनही त्यांनी पंतप्रधानांवर स्तुतिसुमनं उधळली. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. पक्षातील काही नेत्यांनी थरूर यांच्यावर उघडपणे टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी केंद्र सरकारने परदेशात पाठविण्यात आलेल्या शिष्टमंडळात शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी थरूर यांनी अनेक देशांमध्ये भारताची बाजू भक्कमपणे मांडली. इतकंच नाही, तर पाकिस्तानवर टीका करून त्यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमनंही उधळली. त्यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना उघडपणे लक्ष्य केलं होतं.

दरम्यान, रशियातील एका टीव्ही कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण करून शशी थरूर यांनी तेथील राजकीय नेत्यांबरोबर बैठक घेतली. यादरम्यान, देशाच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गुप्त बैठक घेतली होती आणि त्यांचा परदेश दौरा हा राजकीय मोहिमेचा भाग होता, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, थरूर यांच्या निकटवर्तीयांनी या चर्चांचं खंडन केलं. पंतप्रधान मोदी आणि थरूर यांच्यातील बैठकीचा कोणताही संदर्भ खरा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

थरूर यांनी परदेशात भारताची बाजू कशी मांडली?

  • शशी थरूर हे केंद्र सरकारने परदेशात पाठविलेल्या शिष्टमंडळाचा भाग होते.
  • पाकिस्तानची पोलखोल करून, त्यांनी परदेशात भारताची बाजू भक्कमपणे मांडली.
  • पनामा दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारवर स्तुतिसुमनं उधळली.
  • २०१६ मध्ये भारताने पहिल्यांदाच नियंत्रण रेषा ओलांडली होती. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते, असं ते म्हणाले होते.
  • २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा समूळ नाश केल्याचं थरूर म्हणाले होते.
  • त्यावेळी भारताने नियंत्रण रेषाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून एक पाऊल पुढे टाकले होते, असंही थरूर यांनी सांगितले.

आणखी वाचा : जॉर्ज फर्नांडिस : रेल्वे संपाचा नायक आणि हुकूमशाहीविरोधातील लढणारा नेता

काँग्रेसच्या नेत्यांची थरूर यांच्यावर टीका

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांबरोबर बोलताना थरूर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. आमच्यासाठी देश प्रथम येतो; परंतु काही लोकांसाठी मोदी प्रथम येतात, असा अप्रत्यक्ष टोला खरगे यांनी थरूर यांना लगावला. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही शशी थरूर यांच्याविषयी बोलताना पक्ष त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकतो, असं सूचक वक्तव्य केलं. इतकंच नाही, तर त्यांनी ज्येष्ठ नेत्याला पक्षाची शिस्त पाळण्याचा सल्लाही दिला. या घडामोडींनंतर शशी थरूर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

shashi tharoor and pm modi (PTI Photo)
पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (छायाचित्र पीटीआय)

“उडण्यासाठी परवानगी मागत बसू नका. पंख तुमचे आहेत आणि आकाश कोणाचंही नसतं,” अशा मजकुरासह थरूर यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला. त्यानंतर २४ तासांच्या आत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मणिकम टॅगोर यांनी थरूर यांना एक सावधगिरीचा सल्ला दिला. एक्सवरील शेअर केलेल्या पोस्टमध्ये मणिकम टॅगोर म्हणाले, “उडताना खबरदारी घ्या. कारण- आकाशात गिधाडं असू शकतात. काही शिकारी पक्षी देशभक्तीचे पंख लावून फिरत असतात.” या संपूर्ण घडामोडीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आणि थरूर हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या.

भाजपा प्रवेशाबद्दल शशी थरूर काय म्हणाले?

परदेश दौऱ्यावर असलेल्या थरूर यांना तुम्ही काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर उत्तर देताना माझ्या मनात पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही, असं थरूर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, रशियातील दौर्‍यानंतर थरूर हे लंडनमध्ये महिला सशक्तीकरणावर होणाऱ्या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार असून, तेथे काही अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेणार आहेत. त्यानंतर ते ग्रीसचा दौरा करणार असून, तिथेही अशाच प्रकारच्या भेटीगाठी घेणार आहेत.

शशी थरूर त्यांच्या भूमिकेवर ठाम

काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार केली जाणार टीका व टोमण्यांनंतरही शशी थरूर हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, ते नेहमीच स्वतंत्रपणे बोलले आहेत आणि त्यांनी कधीही कोणाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा केलेला नाही. दरम्यान, काँग्रेस पक्षात सध्या थरूर यांच्याविषयीचा विश्वास कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. पक्षाच्या मते, थरूर वारंवार आणि हेतुपुरस्सर अशा प्रकारची वक्तव्यं करत असतात, ज्यामुळे पक्षासह राहुल गांधी अडचणीत येतात.

पंतप्रधान मोदींवर उधळली होती स्तुतिसुमनं

ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेसनं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. तेव्हा थरूर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळत पहिला सर्जिकल स्ट्राइक त्यांच्याच काळात झाला असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या या वक्तव्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. “थरूर हे काँग्रेसचे खासदार असूनही असं वक्तव्य करण्याची गरज काय होती,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा : संजय गांधींच्या मैत्रीण रुख्साना सुलताना कोण होत्या? आणीबाणीत १३ हजार पुरुषांची नसबंदी कुणी केली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशी थरूर भाजपासाठी फायदेशीर?

दरम्यान, संसदेचे आगामी अधिवेशन अगदी रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे- ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे विरोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडून, भाजपाकडूनही शशी थरूर यांच्याकडे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात थरूर यांच्याभोवती राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित मानलं जात आहे. शशी थरूर हे यापुढे पक्षासाठी अडचणीचे ठरले, तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल, असं काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितलं आहे.