राज्याच्या बहुतांश भागांत सध्या तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार होत आहे. मात्र, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने, त्याचप्रमाणे उत्तर भारतातून राज्याकडे थंड वारे वाहणार असल्याने दोन ते तीन दिवसांत गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील किमान तापमानात घट झाल्याने तेथे रात्री थंडी जाणवत आहे. मुंबईकरांना मात्र थंडीची प्रतीक्षा आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचप्रमाणे दोन ते तीन दिवसांपासून उन्हाचा चटकाही बसू लागला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामानाची स्थिती आहे. या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याने रात्रीचा गारवा कमी झाला आहे. मात्र, ही स्थिती तीन ते चार दिवसांनी बदलणार आहे. राज्यात कोरडे हवामान होणार आहे. त्यामुळे गारवा वाढण्याचा अंदाज आहे.

मुंबईतील तापमान स्थिर

* राज्यातील तापमानात हळूहळू घट होऊ लागली असली तरी मुंबईतील कमाल आणि किमान तापमान काहीसे स्थिर आहे. हवेत गारवा असला तरी थंडी मुंबईकरांसाठी अद्याप काहीशी दूर असल्याचे दिसते.

* कुलाबा वेधशाळेने रविवारी ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची आणि २५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली.

* सांताक्रूझ विभागाने ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तर २३.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली. पुढील दोन दिवसांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.