दहा महिन्यांत एकदाही वीजबिलाचा भरणा नाही

पुणे : दहा महिन्यांमध्ये एकदाही वीजबिलाचा भरणा न करणारे पुण्यासह पश्चिाम महाराष्ट्रात तब्बल १४ लाख ग्राहक असून, या सर्वांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दूरचित्र संवादाद्वारे आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. या वेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. १ एप्रिल २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिाम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यांत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा. आवश्यकता असल्यास हप्त्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. थकबाकीचा भरणा न करणाऱ्या इतर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा देखील नियमानुसार खंडित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिाम महाराष्ट्रात गेल्या १० महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक १२ लाख ६८ हजार ४८७ असून त्यांच्याकडे ८५६ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर १ लाख ३८ हजार ८७० वाणिज्यिक ग्राहकांकडे २६४ कोटी ३२ लाख आणि २२ हजार ४५४ औद्योगिक ग्राहकांकडे १२६ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे. वीजबिलांबाबत शंका, तक्रारींचे निरसन तसेच विनंती करून देखील प्रतिसाद नसल्याने या वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यातच खंडित करण्याची कटू कारवाई सुरू करण्यात येत असल्याचे नाळे म्हणाले. या कारवाईसाठी पथके तयार करून आवश्यक संख्येत कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी इतर कार्यालयांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा या पथकांमध्ये समावेश करावा, अशी सूचना त्यांनी केली.

सर्वाधिक थकबाकी पुणे विभागात

पश्चिाम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक थकबाकी पुणे विभागात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यङ्मस्थितीत पुणे (१०३२.८० कोटी), सातारा (१४०.३६ कोटी), सोलापूर (२५९.१२ कोटी), सांगली (१९२.५४ कोटी) आणि कोल्हापूर (३३७.४३ कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण १९६२ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी १२४७ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या १४ लाख २९ हजार ८११ वीजग्राहकांनी गेल्या १ एप्रिल २०२० पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधून देखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नाइलाजाने पुढील तीन आठवड्यांत या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.