महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे साहित्याची धुरा

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने निर्मिलेल्या विश्वकोशाच्या खंडातील नोंदी अद्ययावत करण्याच्या उद्देशातून विषयानुसार ६० ज्ञानमंडळांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था,  गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था या संस्थांचा समावेश आहे. साहित्याची धुरा महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपविण्यात आली आहे.

विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी गुरुवारी ही माहिती दिली. विश्वकोश मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या.

करंबळेकर म्हणाले,‘‘ ज्ञानमंडळाच्या रचनेमध्ये पाच तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ आणि समन्वयक यांचा समावेश असेल. हे ज्ञानमंडळ महाराष्ट्रातील त्या विषयासंबंधातील लेखकांचा शोध घेऊन त्यांच्या मदतीने नोंदी लेखनाचे आणि नोंदी अद्ययावत करण्याचे काम करेल. ही सर्व माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर वाचकांना उपलब्ध होईल. त्याद्वारे विविध विषयांवरील तज्ज्ञांची एक साखळी निर्माण होऊन सर्व विषयांवरील जागतिक ज्ञान मराठीमध्ये आणण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहील. मंडळातील विविध सदस्य त्यांच्याशी निगडित विषयांच्या ज्ञानमंडळाचे पालक म्हणून काम पाहणार आहेत. एका ज्ञानमंडळाने वर्षांला तीनशे नोंदी कराव्यात अशी अपेक्षा आहे.’’

ज्ञानमंडळ स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई विद्यापीठाबरोबर दहा ज्ञानमंडळांसाठी सामंजस्य करार झाले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, मराठी विज्ञान परिषद या संस्थांशी करार झाला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सामंजस्य करार लवकरच अपेक्षित असल्याचे करंबळेकर यांनी  सांगितले.

ज्ञानमंडळामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवड करून दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवू, असे प्रा. मििलद जोशी यांनी सांगितले. ज्ञानमंडळातील सल्लागार आणि समन्वयक यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी परिषदेने स्वीकारली आहे. मंडळाच्या सदस्या डॉ. अरुणा ढेरे या ज्ञानमंडळाच्या पालक असतील. त्यांच्याशी विचारविनिमय करूनच काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.c