भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एक एकेट्याने लढा असे आव्हान महाविकास आघाडीतील तीन ही पक्षांना केले. त्या विधानावर राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हेच यावरचे उत्तर आहे. वर्षभरात हे सरकार पडेल अशी अफवा परसरवली जात होती. पण हे सरकार टिकले. विजयाकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर देणं गरजेचं वाटत नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीचा विजयोत्सव लाडू वाटून साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक मतदार संघाचे विजयी जयंत आसगावकर, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री विश्वजीत कदम बोलत होते.

यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले की, राज्यभरात सहापैकी पाच जागांवर बहुमताने महाविकास आघाडीचा विजय झाला. हा ऐतिहासीक विजय म्हणजे सुज्ञ सुशिक्षीत मतदारांनी आमच्या कामाची पोचपावती दिली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारला वर्षपुर्ती झाली. आज राज्यातील सहा विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचा ऐतिहासीक विजय झाला. शिवसैनिकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तन, मन आणि धनाने अहोरात्र काम केले. त्यामुळे भाजपाचा पराभव करू शकलो. त्या सर्वांचा आभारी असून पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपाने पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सुज्ञ, सुशिक्षीत मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करून त्या विरोधात रोष व्यक्त केला असल्याचे सांगत भाजपवर त्यांनी निशाणा साधला.