पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ३८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची शुक्रवारी (२६ एप्रिल) छानणी केली जाणार असून २९ एप्रिल अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेले दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी एकाने तर पाचव्या दिवशी तीन अर्ज दाखल झाले. त्यात शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. २३ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्यासह सहा  तर २४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, २५ एप्रिल रोजी शेवटच्या दिवशी २० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकूण ३८ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची शुक्रवारी (२६ एप्रिल) छानणी केली जाणार असून २९ एप्रिल अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बंधारपाडा येथील संजय सुभाष वाघेरे आणि उरणमधील संजोग रविंद्र पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचे नाव आणि आडनावाशी नामसाधर्म्य असलेले हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांना उभे करून प्रस्तापित नेत्यांची कोंडी करण्याची खेळी यावेळेसही खेळली असल्याचे या निमित्ताने दिसून आले.

दरम्यान, सन २०१४ च्या निवडणुकीवेळीही लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले दोन उमेदवार रिंगणात होते.