आनंद साजरा करण्याच्या आपल्या कल्पना नेमक्या काय आहेत, असा प्रश्न पडावा, अशा जल्लोषांचे किळसवाणे दर्शन हल्ली शहरातील रस्त्यांवर घडते. निमित्त उत्सवाचे असो, कोणाच्या वैयक्तिक वाढदिवसाचे असो, कोणता तरी सामना जिंकल्याचे असो किंवा काहीही नसो; रात्री-बेरात्री उन्मादी उच्छृंखलपणा कुठे ना कुठे होत राहणे, असेच अलीकडे शहरातील विशेषत: रात्रीच्या वेळचे चित्र होऊ लागले आहे. आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर त्याचे दर्शन पुन्हा घडले, हे या विषयावर पुन्हा नव्याने व्यक्त होण्याचे निमित्त
बेंगळुरूमध्ये आयपीएल स्पर्धेचे यंदाचे विजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या चिन्नास्वामी स्टेडिअममधील सत्कार कार्यक्रमावेळी बाहेर चेंगराचेंगरीची अतिशय दु:खद घटना घडली. ती कशी घडली, याचा तपास होईलच. पण, ‘आयपीएल’चा अंतिम सामना संपल्याच्या रात्री पुण्यासारख्या शहरात झालेल्या उन्मादी जल्लोषानेही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याकडेही लक्ष देणे गरजेचे.
मुळात ‘आयपीएल’चा विजेता काय, स्पर्धेतही पुण्याचा संघ वगैरे होता असे काही नाही. बेंगळुरू १८ वर्षांत प्रथमच जिंकले, तर त्यामुळे पुण्यात बेरात्री जल्लोष करण्याचे कारण काय? तेही अनाकलनीय. विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा आनंदाचा क्षण होता असे त्यातल्या त्यात मानले, तरी त्यामुळे ‘भारता’ने एखादी स्पर्धा जिंकल्यासारखा जल्लोष पुण्यात का व्हावा, हेही कोडे उलगडायला तयार नाही. जिथे तर्क संपतो, तिथे अनागोंदी सुरू होते. सरत्या आठवड्याच्या मंगळवारी रात्री डेक्कन जिमखाना परिसरात जे झाले, तो केवळ उन्माद होता, जल्लोष नव्हे. रस्त्यांवर झुंडीने उतरून अपरात्री कर्णकर्कश हॉर्न वाजवत गाड्या फिरवणे, आरडाओरडा करणे, रस्त्याच्या मधोमध फटाके फोडून वाहतुकीलाच अडथळा निर्माण करणे, निर्वस्त्र होऊन गाडीच्या टपावर किंवा थेट रस्त्यावर उभे राहून अंगविक्षेप करणे असे प्रकार या वेळी घडले. हे यापूर्वी घडलेले नाही, असे नाही; मात्र, परवा फारसे काही मोठे कारण नसतानाही घडले, इतकेच!
या कर्कशपणाचे अर्थ कसे लावावेत, हा खरा प्रश्न. आणि, वर म्हटल्याप्रमाणे अशा गोष्टी करण्यासाठी हल्ली विशेष कोणते कारण लागत नाही, ही त्यातील गंभीर बाब. रात्री उशिरा रस्त्यांवरून प्रवास करताना रस्त्याच्या कडेला दुचाकीवर केक ठेवून भोवती उभे राहिलेले कोंडाळे, त्यांच्या मधोमध एखाद्या दुचाकीच्या सीटवर कापले जाणारे केक, ‘उडणारे’ फटाके आणि मग आरडाओरडा हे चित्र अनेक पुणेकरांनी पाहिले असेल. हुल्लडबाजीची आणखी एक पद्धत म्हणजे धडकी भरतील, असे ‘सायलेन्सर’ लावलेल्या दुचाक्या रस्त्यांच्या मधून वेगात दामटायच्या आणि आजूबाजूच्या लोकांवर उगाचच खेकसायचे. जाता जाता चित्र-विचित्र आवाज काढून शेजारच्या दुचाकीवाल्याला दचकावण्याचे खेळही अगदी सर्रास चालतात. भरीला शहरातील शांत भागांतून गाडी चालवताना बोंब मारणे हीसुद्धा एक नवी पद्धत. बरे, यांना समजवायला गेले, तर आपल्या पदरी धमक्या, मारामारीचे प्रसंग येण्याची किंवा चाकू, सुरे, कोयते, पिस्तुले नाचवले जाऊ शकतात, याची भीती असतेच!
आपल्याला एकत्र येऊन आनंदही नीट व्यक्त करता येत नाही, इतके आपले समाज म्हणून स्खलन झाले आहे का, हा प्रश्न न राहवून वारंवार पडत राहतो. नववर्षाचे स्वागत ते कोणाचा तरी वाढदिवस हे सगळेच रस्त्यावर येऊन साजरे करायचे आहे आणि तेवढ्यापुरते न थांबता त्याचे रील, चित्रफिती तयार करून ते अनेकांपर्यंत पसरावयाचेही आहे. सामना जिंकण्यासारख्या एखाद्या गोष्टीने झालेला आनंद वेगळा आणि त्याने आलेले बेभानपण वेगळे, इतका विवेकही जागा राहिलेला नाही? की इतरांसारखे रस्त्यावर आलो नाही, तर आपण तो आनंदाचा क्षणच गमावू, असा टोकाचा विचार मनात आणणारी, अलीकडच्या संज्ञेप्रमाणे ‘फीअर ऑफ मिसिंग आउट’ – ‘फोमो’ भावना विवेकावर स्वार झाली आहे. सार्वजनिक जीवनात वागायचे कसे, याचे धडे शालेय पाठ्यक्रमातील नागरिकशास्त्रात आपण शिकतो, शिकलो, हे सोयीस्कर विसरले गेले आहे, की तो विषयच ‘ऑप्शन’ला टाकला आहे?
थोडा विवेक जागृत असलेल्या व्यक्तीला हे सगळे पाहून केवळ उद्विग्नताच येऊ शकते. या उन्मादी झुंडी सामान्य माणसाच्या पदरी हतबलता तेवढ्या टाकतात. सुज्ञ पुणेकर आपल्या सार्वजनिक जीवनाचा हा ऱ्हास हताशपणे बघतो आहे. त्याच्यापुढे एकच पर्याय आहे, सहन करणे!
siddharth.kelkar@expressindia.com