लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला आहे. आता पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक आणि क्षेत्रीय कार्यालयनिहाय अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित केली आहे.

गळती, चोरीमुळे पाणीपुरवठा कमी दाबाने, तसेच अपुरा, अनियमित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महापालिका प्रशासनाने समन्यायी पद्धतीने पाणी वितरणासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पवना धरणात ९६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठ्याची नागरिकांची अपेक्षा होती. पण सर्वांना समान आणि मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला आहे.

हेही वाचा… ‘एसटी’चा आरसा! स्वारगेट, शिवाजीनगर स्थानके काठावर पास; पुणे स्थानक अनुत्तीर्ण

दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने, पंप नादुरुस्त झाल्याने, जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. नागरिकांनी तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न निर्माण होत होता. त्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यासह अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार सारथी हेल्पलाइन ८८८८००६६६६ आणि पाणीपुरवठा तक्रार कक्ष (२४ तास) ७७२२०६०९९९ यावर नागरिकांना तक्रार करता येईल.

हेही वाचा… पुणे : गुपित उलगडेना! मेट्रोची ‘बत्ती गुल’ कोणामुळे?

पाणीपुरवठा वेळापत्रक महापालिकेच्या pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. पाणीविषयक तक्रारींबाबत प्रथम त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडून दखल न घेतली गेल्यास संबंधित प्रभागांच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधावा. आवश्यकता वाटल्यास सहशहर अभियंता किंवा अतिरिक्त आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांच्याकडे अ, क, ई, फ आणि ह क्षेत्रीय कार्यालयाचा काही भाग आणि कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे ब, ड, ग आणि अ व ह क्षेत्रीय कार्यालयाच्या काही भागाची जबाबदारी दिली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी उपअभियंता नियुक्त केले असून, त्यांच्या मदतीला क्षेत्रीय कार्यालयाच्या विस्तारानुसार कनिष्ठ अभियंता नियुक्त केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीजपुरवठा खंडित झाल्यास, जलवाहिनी, वितरण वाहिनीला गळती लागल्यास पाणीपुरवठा खंडित होतो. पाणी वितरण प्रणालीत व्यत्यय येतो. त्या वेळच्या परिस्थितीनुसार पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकांमध्ये बदल केले जातात. पाणीपुरवठाविषयक तक्रार असल्यास नागरिकांनी २४ तास सेवेतील तक्रार कक्षाशी किंवा सारथी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. – श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका