पुणे : ‘सत्ता हातात असेल, तरच प्रश्न सुटतात. विरोधी पक्षात बसून, आंदोलने, मोर्चे काढून चालत नाही. आम्ही साधुसंत नाही. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि बेरजेचे राजकारण करण्यासाठी भाजपबरोबर, महायुतीबरोबर जायचे ठरवले,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा २६ वा वर्धापनदिन बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झाला. त्या वेळी पवार बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुनेत्रा पवार, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मंत्री नरहरी झिरवाळ, पुणे शहराचे पूर्व विभागाचे अध्यक्ष सुनील टिंगरे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातात सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे. समाजातील शोषित, वंचित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच पुढे राहिला आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे ध्येय हे पक्षाचे आहे. ध्येय सिद्ध करण्यासाठी सत्ता गरजेची आहे. विरोधी पक्षात बसून मोर्चे, आंदोलने करून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. नागरिकांना न्याय देता येत नाही. त्यामुळे लोकांच्या हिताचे काम करण्यासाठी काही निर्णय हे घ्यावे लागतात. म्हणूनच पक्षाने केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.’

‘राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात कोणत्याही पक्षाची एकहाती सत्ता आली नाही. राष्ट्रवादीला कधीही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. प्रत्येक वेळी कोणाची तरी मदत घ्यावीच लागली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना शिवसेनेला पाठिंबा दिला आणि सत्तेत आलो. मग लोकांचे प्रश्न सुटावेत आणि राज्याचा सर्वांगीण विकासासाठी भाजपला पाठिंबा दिला तर बिघडले कुठे,’ असा सवाल पवार यांनी केला.

‘केंद्रात सत्ताधारी म्हणून काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक निर्णय रोखठोक घेतले. केंद्रात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना जातीय जनगणनेची केवळ चर्चा होत होती. मात्र, त्यावर काही निर्णय झाला नाही. मात्र, मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे जातींची लोकसंख्या निश्चित होणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे आपल्या सर्वांचाच फायदा होत असल्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बरोबर जाण्याचा प्रयत्न २०१४ पासून सुरू होता. त्याबाबत दोन ते तीन वेळा अंतिम निर्णयदेखील झाला होता. मात्र त्यानंतर भूमिका बदलण्यात आली. काँग्रेसचे सरकार असताना २६/११ चा हल्ला झाला. त्या वेळी पंतप्रधान मनमोहनसिंग होते, तर शरद पवार मंत्रिमंडळात होते. त्या वेळी दहशतवाद्यांवर काहीही कारवाई झाली नाही. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. धर्माच्या आधारावर २६ नागरिकांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत काय करू शकतो, हे दाखविले.’ तटकरे, झिरवळ, हसन मुश्रीफ यांनीही मनोगत व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कट्टर धर्मवाद मान्य नाही’

‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा दिला असला, तरी कट्टर धर्मवाद राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही. हा शोषित, वंचित, मागासवर्गीय, तसेच अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारा पक्ष आहे. जातीय द्वेष, धार्मिक द्वेष तसेच कोणत्याही हिंसेला पक्षात स्थान नाही,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.