पुणे : बारामतीतील राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले असून, कारखान्याच्या अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून त्यांनी स्वत:चेच नाव जाहीर केले आहे. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असताना, युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पॅनलही निवडणुकीत उतरल्याने लोकसभा आणि विधानसभेनंतर बारामतीत तिसऱ्यांदा दोन्ही ‘राष्ट्रवादी’ झुंजणार आहेत.अजित पवार यांच्या नेतृत्वाचा कस लावणारी ही निवडणूक युगेंद्र पवार यांच्या उभरत्या नेतृत्वाची परीक्षा घेणारी ठरण्याची शक्यता आहे. या कारखान्यासाठी पहिल्यांदाच चौरंगी लढत होत असून, विरोधकांकडून करण्यात येणारी टीका आणि आरोपांना उत्तर देताना अजित पवार यांची दमछाक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बारामतीतील राजकारणाच्या दृष्टीने माळेगाव सहकारी साखर कारखाना हा महत्त्वाचा मानला जातो. आजवर या कारखान्यावर पवार कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी या निवडणुकीत ब गटातून उमेदवारीअर्ज दाखल केला असून, अध्यक्षपदासाठी स्वत:च्या नावाची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी या निवडणुकीला कमालीचे महत्त्व दिल्याने इंदापूरमधील श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने या निवडणुकीत भाग घेण्याचा निर्णय घेतला. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार आणि युगेंद्र पवार हे दुसऱ्यांदा, तर दोन्ही ‘राष्ट्रवादी’ तिसऱ्यांदा समोरासमोर आले आहेत.

२२ जून रोजी मतदान

सध्या उपमुख्यमंत्री पवार यांच्या ताब्यात हा कारखाना आहे. या कारखान्याची सूत्रे हाती ठेवण्यासाठी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या कारखान्याचे १९ हजार ६०० सभासद असून, २२ जून रोजी होणाऱ्या मतदानात हे मतदार कोणाच्या हाती सूत्रे द्यायची, हे निश्चित करणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार हे स्वत: रिंगणात उतरल्याने त्यांच्या दृष्टीने आरपारची लढाई असून, २४ जून रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

चौरंगी लढतीने अजित पवारांची कोंडी

या कारखान्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पॅनलबरोबरच पारंपरिक विरोधक तावरे यांच्याशीही लढा द्यावा लागत असल्याने सध्या ते कोंडीत सापडले आहेत. त्यातून सुटका करण्यासाठी प्रचारासाठी ते स्वत: उतरले आहेत. ‘बळीराजा सहकार बचाव पॅनल’च्या प्रचाराचा प्रारंभ खासदार सुप्रिया सुळे आणि युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पणदरे येथून करण्यात आला असून, युगेंद्र पवार यांनीही भेटीगाठींवर जोर दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधकांकडून अजित पवार ‘लक्ष्य’

या कारखान्याच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलने अजित पवार यांच्या पॅनलला धक्का देऊन कारखान्याची सत्ता हस्तगत केली होती. मात्र, २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत अजित पवारांनी सत्ता खेचून आणली. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत पवार यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामकाजावरून तिन्ही विरोधी पॅनेलने अजित पवार यांना ‘लक्ष्य’ केले आहे. त्यांच्याकडून करण्यात येणारी टीका आणि आरोपांना उत्तरे देताना अजित पवार यांची दमछाक होत आहे. अजित पवार यांच्याकडे १४ कारखाने आहेत आणि हा कारखानाही ते खासगी करणार, असा आरोप करण्यात येत आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, कारखान्यातील ६० हजार साखरेची पोती भिजली, बेअरिंगवर कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली, असे आरोप प्रामुख्याने तावरे यांच्याकडून प्रचारात करण्यात येत आहेत. हे आरोप अजित पवार यांच्याकडून फेटाळण्यात येत असून, मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये, यासाठी अजित पवार हे किमान दोन दिवसांनंतर तरी बारामतीत प्रत्यक्ष भेट देत आहेत.