पुणे : राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताच्या प्रकारातही वाढ झाली आहे. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक १२ रुग्णांची नोंद बुलडाण्यात झाली असून, पुण्यातही ५ रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

राज्यात १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत उष्माघाताच्या ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत उष्माघाताचे ३७३ रुग्ण आढळले होते. यंदा राज्यात सर्वाधिक १२ रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग ९, वर्धा ८, नाशिक ६, पुणे व कोल्हापूर प्रत्येकी ५, अमरावती, धुळे, सोलापूर, ठाणे प्रत्येकी ३, अहमदनगर, बीड, चंद्रपूर, जळगाव, परभणी, रायगड प्रत्येकी २ आणि अकोला, भंडारा, गोंदिया, नागपूर, नांदेड, धाराशिव, रत्नागिरी, सातारा प्रत्येकी एक अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताने एकही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा >>>पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित

राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. उष्णतेशी निगडित आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांना त्याबाबत उपचाराचे नियोजन करण्याची सूचना केली आहे. या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांमध्ये ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

उष्माघातामुळे होणारा त्रास

मनुष्याचे शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.४ ते ३७.२ अंश सेल्सियस असते. बाहेर अथवा घरात तापमान अचानक वाढल्यास उष्णतेशी निगडित आजार होतात. त्यात शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि उष्माघात असा त्रास होतो. उष्माघातामुळे हृदयविकारासह श्वसनविकार आणि मूत्रपिंडविकाराचा धोका निर्माण होतो.

हेही वाचा >>>घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण

सर्वाधिक रुग्णसंख्या

बुलडाणा – १२

सिंधुदुर्ग – ९

वर्धा – ८

नाशिक – ६

कोल्हापूर, पुणे – ५