बारामती : ‘माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मिळेल. त्यांच्याबरोबर काम करताना बरेच काही शिकायला मिळेल. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना आनंद वाटेल,’ अशी खोचक टिप्पणी कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी केली.
राज्याच्या सहकार क्षेत्रात बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना नेहमीच चर्चेत असतो. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून, या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांचे विरोधक आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी प्रतिक्रिया देताना, ‘अजित पवार यांच्या उमेदवारीचे मी स्वागत करतो,’ असे सांगितले.
‘अजित पवार यांनी ज्या जागेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्या ‘ब’ वर्गामध्ये त्यांची ताकद अधिक आहे. त्यामुळे ते तेथून निवडून येतील. आमचाही उमेदवार ताकतीने निवडणूक लढवेल. मात्र, बिनविरोध निवड होऊ देणार नाही,’ असा विश्वास तावरे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्र्यांबरोबर सध्या होत असलेल्या बैठकांसंदर्भात तावरे म्हणाले, ‘माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात एकही बैठक झाली नाही आणि तसा विचारही नाही. माळेगाव कारखाना वाचवायचा हाच आमचा विचार आहे. कधी नव्हे एवढे, सव्वाचारशे कोटी रुपये कर्ज कारखान्यावर झाले आहे.’