पिंपरी : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात ‘विकसित भारता’चा पाया रचला गेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘कमळ’ रुजले पाहिजे,’ असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी येथे केले.
काळेवाडी येथे झालेल्या भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पश्चिम महाराष्ट्र विभाग संवादक योगेश बाचल या वेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘कमळ’ हे केवळ भाजपचे चिन्ह नसून, आपल्या राष्ट्रीय विचारसरणीचा अविभाज्य भाग आहे. मोदी सरकारच्या ११ वर्षांचा कार्यकाळ हा खऱ्या अर्थाने विकसित भारताच्या पायाभरणीचा काळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘संकल्प से सिद्धी तक’ या सूत्रावर आधारित गेल्या ११ वर्षांत केलेल्या अभूतपूर्व विकासकामांचा आढावा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी महाराष्ट्रात भाजपला अधिक मजबूत करता येईल आणि विकसित भारताच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देता येईल.’