लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘घर चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शनिवार आणि रविवारी (६, ७ एप्रिल) भाजपचे १० हजार कार्यकर्ते शहरातील १० ते १२ लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.

तसेच लोकसभा निवडणुकीसाठी बूथ विजय अभियानही हाती घेण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाची बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या

घाटे म्हणाले, की विधानसभा स्तरावर पक्षाच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे, तसेच पन्नाप्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जातील. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेत या वेळी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. अभियानात प्रत्येक बूथवर गेल्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढविण्याच्या दृष्टीने उपक्रम हाती घेतले जातील. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदारांशी थेट संपर्क, प्रत्येक लाभार्थ्याशी संपर्क, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपचा झेंडा लावणे हे उपक्रमही राबविले जाणार आहेत. युवा, महिला अशा समाजातील विविध घटकांसाठी पाच समूह बैठकाही घेतल्या जातील. अभियान भारतीय जनता पक्षाचे असले, तरी महायुतीतील सर्व घटक पक्षांना त्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे, असेही घाटे यांनी सांगितले.