राज्यातील शेतकऱ्यांची आवश्यकता समजून घेऊन काम करण्याची गरज आहे. कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती हा केवळ एकच उपाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचा नाही, तर शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मंत्र देण्याची गरज असून पाणी, वीज अशा वस्तू देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. असे मत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केले. बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने श्री. श्री. रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर, पालकमंत्री गिरीश बापट, ऑल जर्नालिस्ट असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, ज्येष्ठ संपादक दिनकर रायकर, वसंत मुंढे, विजय बाविस्कर, गोंविंद घोळवे, मंदार फणसे, किरण जोशी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले की, जर या वर्षी कर्जमाफी दिली. तर पुढच्या वर्षी तोच शेतकरी कर्ज बाजारी झाला तर आपल्यासारखे आपणच करंटे असू तर या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पुरवल्या पाहिजे. तसेच शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. यामुळे राज्याचा कृषीचा विकासदर साडे बारा टक्क्यांवर गेला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न ४० हजार कोटींनी वाढले आहे. येत्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जाणार आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, स्वामी विवेकांनदांच्या विचारांचा अविष्कार श्री श्री रविशंकर गुरूजींनी सर्वांसमोर मांडला असून चारित्र्य संपन्न, वैचारिक बैठकीचे अधिष्ठान असलेले नेतृत्व सर्व क्षेत्रात असणे आवश्यक आहे. गुरुजींच्या विचारांच्या माध्यमातून हे घडत आहे.स्वामी विवेकानंदांचे विचार गुरूजींनी प्रकट रुपाने आपल्या समोर मांडले आहेत. याच विचारांतून देशाचे नवीन भविष्य घडणार आहे.अशा शब्दात त्यांचा गौरव त्यांनी केला. यावेळी श्री श्री रविशंकर म्हणाले, सर्वांनी एकत्र येवून काम केले तरच सर्व समाज पुढे जाईल. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा सन्मान करणे हेच खरे अध्यात्म आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्याची साथ देणे हे पत्रकारांचे काम आहे. मात्र हे करत असताना विकास पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहे. समाजात सुरू असणाऱ्या चांगल्या गोष्टी पत्रकारांनी समाजासमोर मांडण्याची गरज आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.