पिंपरी : ‘कुंडमळा दुर्घटना घडल्यानंतर पहिल्या दिवशी काही जण फक्त बघून गेले. मंत्री म्हणून आम्हालाच निस्तरावे लागणार आहे. म्हणून शांत डोक्याने दोन दिवसांनंतर परिस्थितीची माहिती घेतली,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. भंडारा डोंगर येथील नवीन मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कुंडमळा दुर्घटनेची उशिरा पाहणी केल्यावरून होणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘कुंडमळा दुर्घटना घडल्यानंतर पंधराव्या मिनिटाला आमच्या पक्षाचा आमदार घटनास्थळी उपस्थित होता. आपत्कालीन पथक, तहसीलदार, स्थानिक पोलीस आणि सर्व प्रशासकीय जबाबदार यंत्रणांना सूचना करून त्या ठिकाणी योग्य मदत देण्याचा आदेश दिला. असे असताना दोन दिवस अजित पवार फिरकले नाहीत, अशी टीका सुरू झाली.
अजितदादा म्हणाले, बघणारे पहिल्या दिवशी बघून गेले. मात्र, आता मंत्री म्हणून आम्हाला सर्व निस्तरावे लागणार आहे. त्यामुळे शांत डोक्याने नागरिकांच्या प्रतिक्रिया शांत झाल्यानंतर या ठिकाणी सर्व आढावा घेतला. अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणारा पूल कसा असावा, त्याची रुंदी कशी असावी, येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या आणि पादचारी मार्ग यांचा ताळमेळ कसा साधावा, या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.’
‘केवळ टीका करायची म्हणून अजित पवार आले नाहीत, असे म्हटले जात आहे. आम्हीदेखील संवेदनशील आहोत. माणुसकी आम्हाला कळते. नागरिकांना यापुढे कोणतीही गैरसोय होणार नाही, या दृष्टीने नव्या पुलाचे काम केले जाईल. याबाबत अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे पवार म्हणाले.
भंडारा डोंगराच्या कामाचे कौतुक
‘भंडारा डोंगर येथे मंदिराचे खूप सुंदर काम होत आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागेल. त्यानंतर इतर कामे सुरू केली जातील. भंडारा डोंगरावर येणाऱ्या भक्तांसाठी सोयीच्या काही गोष्टी करायच्या आहेत. डोंगराच्या पायथ्याला सव्वाशे एकर गायरान आहे. तिथे काही सुविधा उभारण्याची मागणी देवस्थान आणि स्थानिक आमदारांनी केली आहे. संत तुकाराम महाराजांचे काम जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हे काम सुरू आहे,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री येणार असल्याने मी पुढच्या वर्षीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणार आहे. सुरक्षाव्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता मी हा निर्णय घेतला. – अजित पवार, उपमुख्यमंत्री.