पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी सोहळ्यातील चौघडा, चांदीचा पालखी रथ ओढण्यासाठी देहू संस्थानने स्वत:च्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदापासून रथ ओढण्यासाठी शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांना मान देण्याची प्रथा खंडित होणार आहे.

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून १८ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज संस्थानची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये संस्थानच्या निकषात बसतील, अशा दोन बैलजोड्या श्री संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक सर्वसाधारण बैलजोडी चौघडा गाडीसाठी विकत घेण्यात येणार आहे.

दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात. हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोड्यांना मान दिला जात होता. मात्र, यंदा बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पालखी रथाच्या बैलजोड्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन देहू देवस्थान संस्थानच्या वतीने करण्यात येत असे. त्यानुसार, इच्छुक बैलगाडा मालक, शेतकरी आपल्या बैलजोड्या जुंपण्यासाठी अर्ज करायचे. त्यातून देवस्थानकडून बैलजोड्यांची निवड करण्यात येत होती. त्यावरून अनेक बैलमालक नाराज व्हायचे. त्यामुळे संस्थान स्वत:च बैलजोड्या विकत घेणार असल्याने कोणीही अर्ज करू नये, असे आवाहन संस्थानने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी रथासाठी दोन आणि चौघडा गाडीसाठी एक अशा तीन बैलजोड्या देवस्थान खरेदी करणार आहे. बदल म्हणून हा निर्णय घेतला आहे. पालखी रथास जोडण्यासाठी कोल्हापूर, सातारा आणि कर्नाटकच्या बाजारपेठेत जाऊन बैलांची पाहणी करून तीन जोड्या विकत घेतल्या जाणार आहेत. या बैलजोड्या शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्यात येणार आहेत. बैलांचा सांभाळ देवस्थान करणार आहे. – जालिंदर महाराज मोरे, अध्यक्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान, देहूगाव