पुणे : शिक्षक पत्नी, दोन मुलांचा खून करुन डाॅक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड शहर परिसरात घडली. कौटुंबिक वादातून डाॅक्टरने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली असून, या घटनेनंतर दौंड शहरात खळबळ उडाली आहे.

डाॅ. अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२), पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९), आदिवत अतुल दिवेकर (वय ९), वेदांती अतुल दिवेकर (वय ६) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अतुल दिवेकर आणि कुटुंबीय दौंड शहरातील वरवंड परिसतील चैत्राली पार्क सोसायटीत राहायला होते. डाॅ. दिवेकर पशूवैद्यकीय तज्ज्ञ आहेत. त्यांची पत्नी पल्लवी एका शाळेत शिक्षिका आहे. मंगळवारी दिवसभर दिवेकर कुटुंबीयांचा घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घराचा दरवाजा वाजविला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा डाॅ. अतुल यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. शेजारीच पल्लवी यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या गळा दोरीने आवळून खून करण्यात आला होता.

हेही वाचा >>>धक्कादायक!: अंध असल्याने महिलेला गॅस कनेक्शन नाकारलं; पर्यटन नगरी लोणावळा शहरातील घटना

या घटनेची माहिती दौंड पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा डाॅ. अतुल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिासांनी जप्त केली. ‘मी आत्महत्या करत असून पत्नी आणि दोन लहान मुलांचा खून केला आहे. मुलांचे मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत टाकून दिले आहेत’, असे डाॅ. अतुल यांनी चिठ्ठील लिहिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या पथकाने त्वरीत चैत्राली पार्क परिसरात असलेल्या विहिरीजवळ धाव घेतली. विहिरीत पाणी असल्याने मुलांचे मृतदेह सापडले नाही. पोलिसांच्या मदतीने ग्रामस्थांनी विहिरीतील पाणी मोटारीने उपसण्यास सुरूवात केली. अंधार पडल्यानंतर विहिरीतील पाणी उपसण्याचे काम सुरू होते.