बाबांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. प्राथमिक शिक्षण म्युनिसिपालिटीच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये. रसायनशास्त्राची पदवी संपादन करून त्यांनी आयुर्वेद महाविद्यालयात वैद्यकशास्त्राची पदविका मिळवली. वडील लहानपणीच वारल्याने बाबा व त्यांच्या भावंडांचे संगोपन त्यांच्या आईने आजोळीच केले. बाबांचे आजोबा सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतील आघाडीचे नेते. हायस्कूलमध्ये असतानाच बाबांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. १९४३ ते १९५० या काळात ते नियमितपणे शाखेत जात. रात्रीच्या कामगार शाखांचे ते संघटक म्हणून काम पाहत होते. त्यातूनच हमालांबरोबर त्यांचा घनिष्ठ संबंध निर्माण झाला. त्यांचे प्रश्न, व्यथा ऐकून बाबा अस्वस्थ झाले व त्यांनी त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना बांधायला सुरुवात केली. बाबांच्या नेतृत्वाखाली या संघटनेने चांगलाच जोर धरला.

हमाल पंचायत ही बाबांच्या कार्यक्षेत्राचा मानबिंदू व केंद्रबिंदू. १९५५ मध्ये हमाल पंचायतीची स्थापना होऊन बाबांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलने, चळवळी झाल्यामुळे महाराष्ट्रात १९६९ मध्ये माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला. कोणतेच हक्क व कामाची सुरक्षितता नसलेल्या हमालांना संघटित करून कायद्याद्वारे किमान सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम बाबांनी हमालांसाठी केले. हमालांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले. आज हमालांची दुसरी पिढी शिक्षणात उंच झेप घेताना दिसत आहे. सबंध महाराष्ट्रभर हमाल पंचायत अत्यंत सुसंघटित व प्रबळ संघटना मानली जाते. याचे सारे श्रेय बाबांच्या संघर्षशील व रचनात्मक कार्यपद्धतीलाच द्यावे लागेल.

खरे तर त्या काळात बाबांनी आपला दवाखानाही सुरू केला होता व त्यांची प्रॅक्टिसदेखील तुफान चालली होती. त्यांनी व्यक्तीकेंद्रित विचार केला असता, तर कदाचित ते नामवंत डॉक्टर होऊन पैसाही भरपूर कमावू शकले असते. परंतु, प्रॅक्टिस की चळवळ, यातून निवड करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी यत्किंचितही वेळ न दवडता आयुष्यभर सार्वजनिक जीवनासाठी वाहून घेतले. त्यांच्या आईने व पत्नी शीलाताईंनीदेखील कोणताच विरोध न करता त्यांच्या निर्णयाला आयुष्यभर साथ दिली. कुटुंबाचा आर्थिक भार शीलाताईंनी उचलला. त्यामुळे बाबांना खऱ्या अर्थाने समाजाचा संसार करता आला.

बाबांची वैचारिक जडणघडण किशोरवयापासून राष्ट्र सेवा दलात झाली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व नेते भाई वैद्य त्यांचे सहाध्यायी. त्यांच्यात राजकीय मतभेद होते, परंतु मनभेद कधीच नव्हते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांवर एकमत होते. गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बाबा अग्रभागी होते. त्यामध्ये बाबांना कारावासही झाला. आणीबाणीत झोपडपट्टीवासीयांचा मेळावा घेतला म्हणून ‘मिसा’खाली अटक होऊन १४ महिने येरवड्याच्या तुरुंगात जावे लागले. त्या आधी १९६३ मध्ये बाबांनी महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन परिषदेची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते होणारा कुकडी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ बाबांनी उधळून लावला. या अभूतपूर्व सत्याग्रहात बाबांना आपला एक डोळा कायमचा गमवावा लागला. पण, महाराष्ट्रात प्रथमच धरणग्रस्तांसाठी पुनर्वसनाचा कायदा झाला.

प्रजा समाजवादी, संयुक्त समाजवादी पक्षाच्या वतीने १९५५ ते १९७१ या काळात एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे व भाई वैद्य यांच्यासमवेत बाबांनी विविध चळवळी, आंदोलने केली. बाबा सामाजिक लढ्यांबरोबरच राजकारणातदेखील अग्रेसर होते. त्या वेळी बाबा पुणे महापालिकेच्या नगरसेवकपदी लागोपाठ दोन वेळा निवडून आले होते. १९७१ नंतर मात्र बाबांनी निवडणुकीच्या राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ सामाजिक चळवळीच्या कामासाठी वाहून घेतले.

१९७२ मध्ये बाबांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानाची स्थापना केली. त्याच वर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला व पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही दलितांचे व सवर्णांचे पाणवठे वेगवेगळे होते, हे बाबांनी नेमके हेरून, जातिव्यवस्थेवर नेमके बोट ठेवून, ‘एक गाव, एक पाणवठा’ या ग्रंथामध्ये हे कथन केले. या चळवळीमुळे गावातील जातीयतेच्या भिंती अजूनही किती घट्ट आहेत, याची कल्पना सर्व समाजाला आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खेड्यातून शहराकडे चला, असे आपल्या समाज बांधवांना का सांगत होते, याची प्रचिती यातून आली. त्यानंतर बाबांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानतर्फे पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांच्या प्रचार व प्रसाराकरिता सत्यशोधक त्रैमासिक १९७४ मध्ये प्रकाशित केले. गेली ५० वर्षे ते अखंडपणे प्रकाशित होत आहे.

चळवळ, आंदोलन, सत्याग्रह, उपोषण, प्रबोधन, संवाद व संघटन या लोकशाहीतील साधनांवर बाबांचा विश्वास आहे. ‘जिथे शोषण असेल, तिथे ते थांबवायचे व शोषणकर्त्यांना भिडायचे,’ असे त्यांच्या सर्वच लढ्याचे तत्त्व आहे. त्यांच्या मते, फक्त संघटना बांधून उपयोग नाही, तर संघटनेच्या कामाबरोबरच जनतेशी आपले नाते निर्माण झाले पाहिजे. ‘एक गाव, एक पाणवठा’, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी पुण्याहून लाँग मार्च, जयपूर येथील उच्च न्यायालयासमोरील मनूचा पुतळा हटविण्यासाठी महाड ते जयपूर अशी पदयात्रा, २००५ मध्ये देशातील असंघटित क्षेत्रातील ४५ कोटी जनतेला सामाजिक सुरक्षा कायद्यांचे संरक्षण मिळावे, यासाठी महाड ते दिल्ली अशी पदयात्रा यांत ते अग्रभागी होते. संसदेने सामाजिक सुरक्षा कायदा मंजूर केला आहे. आता त्याच्या अंमलबजावणीसाठी बाबांचा संघर्ष चालू आहे.

बाबांनी विषमता निर्मूलन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध परिवर्तनवादी संघटनांना एकत्र आणून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती दिली. बाबांचा या वयातही संघर्षाचा, आंदोलनाचा प्रवास संपलेला नाही. देशात धार्मिक ध्रुवीकरण, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोगाचे वागणे, संविधानाच्या तत्त्वांची पायमल्ली, निवडणुकीतील अपारदर्शकता आदी प्रश्नांमुळे बाबांच्या मनात खूप अस्वस्थता व चीडदेखील आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी महात्मा फुले वाड्यात त्यांनी तीन दिवसांचे आत्मक्लेश उपोषण केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या शिक्षण, आरोग्य व महागाईच्या प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले आहे. अशा वेळी आपणच जनतेशी संवाद साधला पाहिजे, त्यांचे प्रबोधन केले पाहिजे व त्यातून जनतेचे प्रबोधन करून आपल्या हक्कासाठी व न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे, या भावनेने हे आत्मक्लेश उपोषण होते. जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर न्याय मिळविण्यासाठी ते आजही संघर्षरत आहेत. शेवटच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा संघर्षयात्री थांबणार नाही, प्रश्न विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सुरेश भटांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘हे असे आहे तरी, हे असे असणार नाही ! दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही !’ अशा या संघर्षयात्रीस ९६ व्या वाढदिवसानिमित्त नवीन संघर्षासाठी खूप खूप शुभेच्छा.- ॲड. शारदा वाडेकर (लेखिका महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस आहेत.)