पुणे : ‘बाबा भिडे नेहमी म्हणायचे ‘संघ काही करणार नाही; पण सगळे काही संघाच्या मनासारखे होईल.’ आता ही अवस्था आली आहे, असे वाटते. आपला मूळ विचार, प्राचीन इतिहास आणि समृद्ध वारसा लोकांपर्यंत पोहोचावा, हेच संघाला हवे होते. आता तसेच होते आहे. आताची परिस्थिती संघाला हवी तशीच आहे,’ असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी व्यक्त केले.

‘स्टेशनरी, कटलरी ॲन्ड जनरल मर्चंट्स असोसिएशन’च्या वतीने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ‘व्यापारी एकता दिना’निमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उद्योजक राजेंद्र बांठिया, चंद्रकांत आदमाने, श्रीनिवास जन्नू, किरण चौहान, सुनीता गोंधळेकर, ऐश्वर्या शेलार, कांचन जांभळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमदार हेमंत रसाने, संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी, संजय राठी, मोहन कुडचे, किशोर पिरगळ या वेळी उपस्थित होते.

बागडे म्हणाले, ‘आपली भारतीय संस्कृती उद्ध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले. इथे गुलामगिरी रुजविण्यासाठी इंग्रजांनी शिक्षणपद्धती बदलण्याचा मार्ग अवलंबला. स्वातंत्र्यानंतरही देशात हीच शिक्षणपद्धती सुरू होती. मात्र, त्यात बदल करण्याचे फार कमी प्रयत्न झाले.’

‘प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धतीचे शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देणारे होते. इथल्या परंपरेत, लोकांमध्ये नैतिक मूल्ये खोलवर रुजली होती. त्यामुळे या देशाला गुलाम बनवणे सहज साध्य नव्हते. आपला मूळ विचार पुढे नेण्याचे काम संघाच्या माध्यमातून करण्यात आले,’ असेही बागडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुण्याला नवी ओळख देणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे. ऐतिहासिक काळापासूनच मध्यवर्ती पुण्यातील ‘कसबा’ व्यापाराबरोबरच धुरिणांचेही केंद्र होते. सांस्कृतिक, सामाजिक वारसा असलेला हा कसबा स्वच्छ आणि सुंदर करण्यात व्यापाऱ्यांनीही योगदान द्यावे,’ अशी अपेक्षा रासने यांनी व्यक्त केली, नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.