Hindu and Muslim weddings under one roof in Pune : गेल्या तीन-चार दिवसांपासून समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की एकाच लग्नाच्या हॉलमध्ये हिंदू जोडप्याचा विवाह आणि मुस्लीम जोडप्याचं रिसेप्शन (स्वागत समारंभ) पार पडलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या लग्नाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत ‘हाच खरा आपला भारत’ असल्याचं म्हटलं आहे. तसेच दोन्ही जोडप्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे.
आव्हाड यांनी म्हटलं आहे की “२० मे २०२५ च्या संध्याकाळी पुण्यातील वानवडी परिसरातील अलंकरण लॉन्समध्ये संस्कृती कवाडे पाटील आणि नरेंद्र गलांडे पाटील यांचा हिंदू विवाह सोहळा पार पडत होता. मात्र, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे खुले मैदान ओलेचिंब झाले आणि सायंकाळी ६:५६ वाजता होणारे मुख्य लग्न विधी पार पाडणे अशक्य झाले. या गोंधळात, लग्न थांबण्याची वेळ आली”.
अन् काझी कुटुंबाने सभागृह हिंदी कुटुंबासाठी खुलं करून दिलं
“दरम्यान, शेजारीच, काझी कुटुंबीय मोहसिन काझी आणि माहीन यांचा मुस्लीम विवाहानंतरचा स्वागत समारंभ (वालीमा) एका बंद हॉलमध्ये साजरा करत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, हिंदू कुटुंबाने काझी कुटुंबाकडे मदतीची विनंती केली. त्यावर काझी कुटुंबीयांनी अत्यंत आपुलकीने, दिलदारीने आणि कोणताही विचार न करता आपला स्टेज वापरण्यास दिला आणि स्वतःचा कार्यक्रम थांबवून संपूर्ण एक तास हिंदू वधूवरांना सप्तपदी विधी पूर्ण करू दिला”.
…तर आपल्या देशाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल : जितेंद्र आव्हाड
आव्हाड म्हणाले, “त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकत्र येत स्टेज आणि सभागृह सामायिक केले. पाहुणे एकमेकांना मदत करत होते आणि शेवटी दोन्ही धर्मीय पाहुण्यांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत सौहार्द आणि बंधुभाव जपला. हा प्रसंग केवळ दोन कुटुंबांमधील मदतीचा नव्हे, तर संपूर्ण भारताच्या एकतेचं, सहिष्णुतेचं आणि सुसंवादाचं जिवंत उदाहरण आहे. विविधतेतून एकता हे भारताचे खरे सौंदर्य आहे आणि असेच जर आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिलो, तर आपल्या देशाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल”.
राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार म्हणाले, “असंच सौहार्द जर प्रत्येक समाजात निर्माण झाले, तर ‘आपला भारत’ अधिक सुंदर, मजबूत आणि प्रेमळ बनत जाईल. धर्म, जात, भाषा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जर आपण माणुसकी जपली, तर भारताची खरी ओळख जगासमोर उभी राहील”.