पुणे : मालेगांव बाॅम्बस्फोट प्रकरणातील भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांचा चेहरा वापरून आतंकवादाचा जिहादी चेहरा लपविण्यात आला. तसेच हिंदू दहशतवाद ही खोटी संकल्पना मांडण्यात आली, असा दावा 'ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड' या पुस्तकाच्या प्रसिद्ध लेखिका स्मिता मिश्रा यांनी रविवारी येथे केला. तात्पुरत्या राजकीय स्वार्थापोटी काही राजकीय पक्षांनी राष्ट्राचे दीर्घकालीन नुकसान करून ठेवले आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, तपासी यंत्रणा आणि पोलिस विभागात सुधारणा आवश्यक असल्याचा बोध यानिमित्ताने घ्यावा लागेल, असे माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी सांगितले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी, भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर आधारित आणि स्मिता मिश्रा लिखित 'ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड' या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याचे माजी पोलीस आयुक्त, निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या हस्ते रविवारी झाले. प्रकाशिका रेणू कौल वर्मा, निवृत्त मेजर गौरव आर्य, सनदी लेखापाल रणजीत नातू, धनंजय बर्वे, प्रसाद पुरंदरे यावेळी उपस्थित होते. हेही वाचा >>> ले. कर्नल पुरोहित ‘द मॅन बेटरेड’ पुस्तक प्रकाशन सोहळा; पुण्यात भीम आर्मी बहुजन एकता आणि मूलनिवासी मुस्लिम मंचाचे आंदोलन हिंदू दहशतवाद संकल्पना होती, हा नव्या पीढीचा भ्रम दूर करण्यासाठी पुस्तक लिहिण्यात आले आहे. अनेक पातळ्यांवर दबाव आणि दहशत सहन करावी लागली. तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्ष राष्ट्राचे दीर्घकालीन नुकसान करत आहेत. हिंदू दहशतवाद संकल्पना अस्तित्वात नसताना एकच खोटे सातत्याने सांगितल्याने येणाऱ्या पिढीला कदाचित ही संकल्पना खरी देखील वाटू शकली असती. या प्रकरणात माध्यमांनीही खातरजमा न करता चुकीची माहिती पुढे आणली, असे स्मिता मिश्रा यांनी सांगितले. हेही वाचा >>> गृहमंत्री अमित शहा, चंद्रकांत पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य; माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल तपासी यंत्रणा आणि पोलिस विभागात सुधारणा आवश्यक - जयंत उमराणीकर जयंत उमराणीकर म्हणाले, पोलिसांना अधिकार दिले; परंतु त्या अधिकाराच्या अंमलबजावणीत अनेक कायदेशीर अडथळे निर्माण करुन ठेवले आहेत. राजकारणी आणि सर्वसामान्य जनता या कात्रीत अडकलेल्या पोलिसांना अधिकार वापरण्यात थोडे स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. मुळात पोलिसांच्या अधिकारांवर जी गदा आणली जाते त्याबाबत जनतेनेच मागणी लावून धरत पोलिसांच्या अधिकारांमध्ये कोणी हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तपासी यंत्रणा आणि पोलिस खात्यात काही सुधारणा कराव्या लागणार आहेत. प्रकाशिका रेणू कौल वर्मा यांनी पुस्तक प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली. रणजीत नातू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी सूत्रसंचलन केले. हेही वाचा >>> महामोर्चामध्ये ठाकरे गटाचा भगवा दिसलाच नाही: शंभूराज देसाई यांची टीका पुरोगामी संघटनांकडून आंदोलन मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोप असलेले कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर स. प. महाविद्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्तामध्ये हा कार्यक्रम झाला. मूल निवासी मुल्सिम मंच आणि भीम आर्मी बहुजन एकता मंचाकडून कार्यक्रमाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. दहशतावादाला पाठिंबा कशासाठी, संविधान जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्याचे माजी पोलीस महासंचालक सत्यपाल सिंह आणि संजय बर्वे कार्यक्रमासाठी काही कारणास्तव अनुपस्थित राहिले. मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजूम इनामदार आणि एकता मंचाचे अध्यक्ष दत्ता पोळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.