पुणे : छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडीत घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून नणंदेसह चौघांविरुद्ध सहकानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वर्षा तुकाराम रणदिवे (वय ३५, रा. व्यंकटेश अपार्टमेंटसमोर, गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उज्ज्वला बागाव (वय ५३), योगेश बागाव (वय ३५), वैशाली बागाव (वय ३२), सुवर्णा बागाव (वय २५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तुकाराम रणदिवे (वय ४३, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उज्ज्वला बागाव फिर्यादी तुकाराम रणदिवे यांची बहीण आहे. रणदिवे आणि बागाव शेजारी राहायला आहेत. उज्ज्वला, तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली, सुवर्णा यांनी वर्षा रणदिवे यांना टोमणे मारून तिचा छळ केला. छळ असह्य झाल्याने वर्षा यांनी गळफास घेऊन २४ मे रोजी आत्महत्या केली.
याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. वर्षा यांचे पती तुकाराम रणदिवे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात वर्षा यांनी आरोपींनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.