लोणावळा : नाताळला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सलग दोन दिवस द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक रविवारी दुपारनंतर सुरळीत झाली. सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने शुक्रवारी सकाळपासून लोणावळा परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली. अनेकजण सहकुटुंब मोटारीतून पर्यटनासाठी आले. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका, खंडाळा घाट, उर्से टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. खंडाळा घाट चढताना मोटारींचे इंजिन गरम होऊन मोटारी बंद पडल्या. त्यामुळे कोंडीत भर पडली.

हेही वाचा : शिक्षक, अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी का दिले?

काही वाहनांमध्ये बिघाड झाले. त्यामुळे घाट क्षेत्रात वाहनांच्या रांगा लागल्या. खालापूर टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी सकाळपासून कोंडीत भर पडत होते. वाहतूक खूपच संथ झाल्याने घाटातील अंतर कापण्यासाठी मोटारचालकांना वेळ लागत होता. वाहतूक कोंडी हटविण्यासाठी बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, खंडाळा महामार्ग पोलीस, वडगाव मावळ महामार्ग पोलिसांनी अथक प्रयत्न केले. तब्बल ३६ तासांहून अधिक काळ द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत होती. महामार्ग पोलिसांनी खंडाळा बोगदा परिसरात मुंबईकडे जाणारी वाहने थांबविली. मुंबईकडून लोणावळ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी द्रुतगती मार्गावरील सहा मार्गिक खुल्या करुन दिल्याने वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत झाली. आयआरबी, देवदूत पथकांसह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

हेही वाचा : “मनोज जरांगेचा अजून अण्णा हजारे झालेला नाही”, डॉ. कुमार सप्तर्षी यांची टिप्पणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांसह महिलांचे हाल

द्रुतगती मार्गावर घाट क्षेत्रात मुंबईकडून मोठ्या संख्येने मोटारी आल्याने वाहतूक कोंड झाली. घाटात तांत्रिक बिघाडामुळे मोटारी बंद पडल्या. त्यामुळे शुक्रवारपासून घाटातील वाहतूक कोलमडून पडली. खालापूर टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकाच ठिकाणी मोटारी थांबून होत्या. पाणी संपल्याने लहान मुलांसह, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. अखेर रविवारी दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली. लोणावळा ते खालापूर दरम्यान मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाल्यानंतर घाट क्षेत्रातील कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षांचा कालावधी लागणार आहे.