पिंपरी : काळा पैसा भारतात आला का, १५ लाख रुपये बँक खात्यात आले का, सर्वांना पक्की घरे मिळाली का, बेरोजगारांना नोकरी मिळाली का, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले का, नवीन उद्योगधंदे आले का, महागाई कमी झाली का, घरगुती गॅसवरील सबसिडी बंद का केली, असा जाब विचारत ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत ठाकरे गटाकडून नागरिकांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या हस्ते ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानाचे आणि पथनाट्याचे उद्घाटन तळवडे येथे करण्यात आले. भोसरी विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, शहर संघटक संतोष वाळके या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: अजित पवार गटाला शह देण्यासाठी शरद पवार गटाचा सायकल दौरा!
रुपीनगर, चिखली, घरकुल, भोसरीतील छत्रपती शिवाजीमहाराज चौक, जय महाराष्ट्र चौक, दिघीमधील धर्मवीर संभाजी राजे चौक, आदर्श नगर संभाजीनगर, चौधरी पार्क, गणेशनगर येथे हे अभियान राबविण्यात येणार आहे. बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी अभियानाचा समारोप होणार आहे. भोसरी मतदारसंघात रथ फिरवून नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची नागरिकांना आठवण करून देण्यात येत आहे.
“होऊ द्या चर्चा अभियानातून सरकारच्या खोट्या आश्वासनांचा बुरखा फाडला जात आहे. महापालिकेच्या निवडणुका घेण्यास भाजप घाबरत आहे. प्रशासकीय राजवटीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यांचा आक्रोश येणाऱ्या निवडणुकीत मतदान पेटीतून व्यक्त होण्याची जाणीव असल्यामुळेच निवडणुका घेतल्या जात नाहीत”, असे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे.