पुणे : पाणी पिण्यास मागितल्याने झालेल्या किरकोळ वादातून एकाने आतेभावालाच्या डोक्यात वीट, तसेच सिमेंटचा गट्टू मारून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंढव्यातील कामगार मैदानाजवळ घडली. याप्रकरणी मुंढवा पाेलिसांनी एकास अटक केली. श्रीकांत निवृत्ती आल्हाट (४२, रा. मुंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राकेश तुकाराम गायकवाड (वय ३५, रा. आनंद निवास, कामगार मैदान जवळ, मुंढवा) याला अटक करण्यात आली आहे याबाबत संतोष आल्हाट (वय ४६, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : या मराठी संशोधकाने ६० वर्षांपूर्वी उपस्थित केला होता विश्वनिर्मितीच्या ‘बिग बँग’ सिद्धान्तावर प्रश्न…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत आल्हाट आणि आरोपी राकेश गायकवाड नातेवाईक आहेत. ते शेजारी राहायला आहेत. श्रीकांत एकटा राहतो. तो मजूरी करुन उदरनिर्वाह करायचा. शनिवारी (८ मे )रात्री तो दारू प्याला होता. रात्री उशिरा पिण्याचे पाणी मागण्यासाठी तो राकेश याच्याकडे गेला. त्यावेळी राकेशने पाणी दिले नाही. त्यामुळे श्रीकांतने त्याला शिवीगाळ केली. राग आल्याने राकेश याने श्रीकांत याच्या डोक्यात वीट, तसेच सिमेंटचा गट्टू मारला. श्रीकांत याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या राकेशला पोलिसांनी अटक केली.