पुणे : ‘उपलब्ध मनुष्यबळाचे उपयुक्त मनुष्यबळात रूपांतर करणे, हे शिक्षण क्षेत्रापुढील आव्हान आहे. त्या दृष्टीने शिक्षण आणि उद्योगांनी एकत्र काम केले पाहिजे. तंत्रज्ञान प्रगत होत असताना पायाभूत सुविधांबाबत दुर्लक्ष आहे. उच्च गुणवत्तेचा ध्यास आणि नैतिकता यांचा अभाव ही त्यामागील कारणे आहेत. तसेच, सामाजिक उत्तरदायित्त्व राहिलेले नाही. अभियांत्रिकी क्षेत्राने आत्मचिंतन करण्याची गरज आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी मांडले.

सुधीर मेहता यांनी लिहिलेल्या ‘माझी जीवनगाथा, मी अनुभवलेले बांधकाम विश्व’ या पुस्तकांचे प्रकाशन योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, डॉ. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’चे सचिव उत्तम आवारी, ‘बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागाचे अध्यक्ष अजय गुजर, शुभदा मेहता या वेळी उपस्थित होते.

शून्यातून जीवन घडवणाऱ्या स्थापत्य अभियंत्याचा प्रवास या पुस्तकांतून आला असल्याचे नमूद करून जोशी म्हणाले,“स्थापत्य अभियांत्रिकीचा थेट समाजाशी संबंध येतो. त्यामुळे मानवी जीवनाचे विविध रंग, रोज नवे आव्हान बांधकाम ठिकाणी पाहायला मिळतात. भविष्यात स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना हा खडतर प्रवास समजला पाहिजे. ‘सीओईपी’सारख्या महाविद्यालयांच्या ग्रंथालयात ही पुस्तके अवांतर वाचनासाठी ठेवली पाहिजेत. शिक्षण आणि प्रत्यक्ष काम, उपयोजनात फरक आहे. गेल्या चाळीस वर्षांत बदललेल्या बांधकाम क्षेत्राची सूक्ष्म निरीक्षणे या पुस्तकात आहेत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वाचत राहावेसे वाटणे लेखनाचे यश आहे. अध्यात्म हे दैनंदिन जीवनाशी संबंधित असते. प्राप्त परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठीची स्वस्थता योगामुळे मिळते. पैसा हे साधन आहे, साध्य नाही, हे विसरले जात आहे. मन शांत होण्यासाठी ध्यान समजून घेतले पाहिजे,’ असे डॉ़. विनोद यांनी सांगितले.