पुणे : वालचंदनगर परिसरात दहशत माजविणारा गुंड राजू भाळे याच्यासह १३ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले.
राजेंद्र ऊर्फ राजू महादेव भाळे (वय ३०, रा. खोरोची, ता. इंदापूर), रामदास ऊर्फ रामा शिवाजी भाळे (वय २६, रा. खोरोची, ता. इंदापूर), शुभम ऊर्फ दादा बापू आटोळे (वय १९, रा. शेळगाव, ता. इंदापूर), स्वप्नील ऊर्फ बालाजी बबन वाघमोडे (वय २५, रा. रेडणी ता. इंदापूर), नाना भागवत भाळे (वय २८, रा. खोरोची, ता. इंदापूर), निरंजन लहू पवार (वय २७, रा. खोरोची, ता. इंदापूर), तुकाराम ज्ञानदेव खरात (वय ३०, रा. खोरोची, ता. इंदापूर), जिजा ऊर्फ मयूर मोहन पाटोळे (वय ३०, रा. निमसाखर, ता. इंदापूर), अशोक बाळू यादव (वय ३०, रा. शेळगाव, ता. इंदापूर), धनाजी गोविंद मसुगडे (वय ३८, रा. कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघे जण फरार आहेत. याबाबत शामराव जालिंदर जाधव (वय ३६, रा. खोरोची, ता. इंदापूर) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खोरोची परिसरातील कुख्यात गुन्हेगार राजू भाळे आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी उत्तम जाधव यांचा खून केला होता. या खून प्रकरणात राजू भाळे याच्यासह दहा जणांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. राजू भाळे टोळीविरुद्ध पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात यापूर्वी बेकायदा पिस्तूल, कोयते, तलवार बाळगून दहशत माजविणे, दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी करणे असे गंभीर स्वरूपाचे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध मकोका अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुन्ह्याची कागदपत्रांची पडताळणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस कर्मचारी महेश बनकर, अभिजित कळसकर यांनी केली आहे.