शिरुर: ‘रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ‘एमईपीएल’ कंपनीमुळे निमगाव भोगी परिसरात निर्माण झालेली प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी पर्यावरण आणि उद्योग विभागाची एकत्रित बैठक मुंबईत घेण्यात येणार आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यांना भरपाई देण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे,’ असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ‘एमईपीएल’ कंपनीच्या प्रदूषणामुळे निमगाव भोगी परिसरात शेतीचे नुकसान होत आहे. या परिसराची ज्येष्ठ नेते शरद पवार, सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाहणी केली. त्या वेळी सामंत बोलत होते. या वेळी माजी आमदार काकासाहेब पलांडे, ॲड. अशोक पवार, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर, बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘या परिसरातील प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी मुंबईत होणाऱ्या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर चर्चा करण्यास तयार आहेत. शेतकऱ्यांबाबतीत कोणी मनमानी करत असेल, तर त्याला चाप लावला जाईल. औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रदूषणावर निर्णायक भूमिका घेतली जाईल. कंपनीकडून केल्या जाणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.’
‘कंपनीला दिलेली जमीन परत घ्यावी’‘‘एमईपीएल’ या कंपनीसाठी नव्याने देण्यात आलेली जमीन ‘एमआयडीसी’ने रद्द करावी. शेती, जनावरे, जमिनीचे नुकसान झाले असल्याने कंपनीने एकरी नुकसानभरपाई द्यावी,’ अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.
‘कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम पाणी, जमीन आणि पिकांवर होत आहे. जमिनीचा पोत बिघडत आहे. निमगाव भोगी परिसरातील गावांमध्ये प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी होणाऱ्या बैठकीला हजर राहणार आहे. या विषयात राजकारण नको,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ‘रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील या कंपनीच्या प्रदूषणाचा विषय संसदेत मांडला. कंपनीच्या प्रदूषणामुळे शेती आणि पाण्यावर परिणाम होत आहे. पाणी आणि माती पुनरुज्जीवनाची जबाबदारी कंपनीने घ्यावी.’