कल्याणीनगर अपघात प्रकरणाला वर्ष पूर्ण झाले. ‘हिट अँड रन’ प्रकारातील या अपघाताची दखल देशभरातील प्रसारमाध्यमांनी घेतली. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नेहमी टीका केली जाते. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी चोख तपास करून टीका करणाऱ्यांची तोंडे बंद केली. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला ताब्यात घेतले. मुलाला वाचविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या बड्या बांधकाम व्यावसायिकासह त्याची पत्नी, वडील, ससूनमधील डाॅक्टर, साथीदारांना अटक केली.
बारावी उत्तीर्ण झालेला बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा १९ मे २०२४ च्या पहाटे मित्रांसोबत मुंढव्यातील एका पबमध्ये पार्टी करून निघतो. परदेशी बनावटीची महागडी मोटार मुलाला चालवू दे, अशी सूचना व्यावसायिक मोटारचालकाला देतो. मध्यरात्री भरधाव निघालेल्या मोटारीवरील नियंत्रण सुटते आणि त्या मोटारीची धडक पुण्यात नोकरीनिमित्त आलेले दुचाकीस्वार संगणक अभियंता अनीश अवधिया, अश्विनी कोस्टा यांना बसते, ज्यात त्यांचा मृत्यू होतो. घटनेनंतर मुलगा सुसाट वेगाने घरी जातो आणि तेथूनच मुलाला वाचविण्यासाठी एकापाठोपाठ गुन्हे करण्याची मालिका सुरू होते…
कल्याणीनगर अपघात प्रकरणात, अपघाताचा गुन्हा आपल्यावर घेण्यासाठी चालकावर दबाव, त्याला डांबून ठेवणे, रक्तनमुन्यात मद्याचे अंश सापडू नये म्हणून चक्क त्यातच फेरफार, त्यात डॉक्टरांची मदत असे अनेक प्रकार उघडकीस आले आणि धनाढ्य व्यक्ती केलेला गुन्हा लपविण्यासाठी काय काय करू शकतात, हे समाजाने पाहिले. त्यानंतर प्रसारमाध्यमे, कल्याणीनगर भागातील रहिवासी, संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मित्र परिवार, कुटुंबीयांनी हे प्रकरण लावून धरले, त्यामुळे पोलिसांनीही चोख कामगिरी केली.
या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत असताना, या प्रकरणाकडे केवळ एक अपघात म्हणून न पाहता यातून यंत्रणा, पालक आणि वाहनचालक म्हणून आपणही काही धडे घेणे आवश्यक आहे. आपण मुलांवर करत असलेले प्रेम आणि फाजील लाड यात फरक आहे. फाजील लाड आणि पैशांच्या जोरावर गुन्हे पचवता येतात, असा समज असणाऱ्या पालकांनी यातून धडा घेण्याची वेळ आता आली आहे. कारण, कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर शहरात गंभीर स्वरूपाचे अपघात कमी झाले, असे नाही. शहर, परिसरात दररोज किमान एक ते दोन गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. वेगाची नशा आणि मुजोरी यामुळे ते होत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे.
मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई तीव्र केली असली, तरी हा बेफामपणा अजून थांबलेला नाही. मद्य पिऊन वाहन चालवणे, वेगाची मर्यादा ओलांडणे हे गंभीर नियमभंग आहेत, हे सुशिक्षितांनाही सांगण्याची वेळ येते, यासारखे दुर्दैव नाही. पुण्यासारख्या शहरात साडेसहा हजार मद्यपी चालक सापडतात, ही गोष्ट निश्चित भूषणावह नाही.
कल्याणीनगर अपघात प्रकरणाला वर्ष होण्याच्या पंधराच दिवसांपूर्वी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर पार्टी करून मित्रांबरोबर मोटारीतून निघालेल्या एका मोटारचालक तरुणाने वेग आणि दारूच्या नशेत वडगाव उड्डाणपुलावर दोन महाविद्यालयीन दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मोटार उड्डाणपुलावरून खाली कोसळली. चालक तरुण आणि त्याच्याबरोबर असलेले बचावले. मात्र, एका महाविद्यालयीन तरुणाचा बळी हकनाक गेला. त्यापूर्वीच्या अन्य एका घटनेत एका तरुणाने नगर रस्त्यावर भर चौकात मोटार थांबवून लघुशंका केल्याचा प्रकार घडला. हाही तरुण मद्याच्या नशेत होता.
गंभीर स्वरूपाचे बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होतात. वाहन भरधाव चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे यामुळे अपघात घडतात, असे निरीक्षण वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. बेशिस्तांवर जरब बसेल, अशी कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड, वाहन परवाना निलंबित करणे असे केल्यासच बेशिस्तीला चाप बसेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या सगळ्याला आणखी एक बाजू आहे, ती अशा अपघातांत काहीही चूक नसताना बळी पडलेल्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची. अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना सावरणार कोण? तरुण मुले गमाविण्याचे दु:ख शब्दांत सांगता येत नाही. आयुष्यभर वेदना घेऊन जगणारे कुटुंबीय, काही क्षणांत उद्ध्वस्त झालेले आयुष्य, स्वप्न, आशा-आकांक्षाचा चुराडा अशा गोष्टींची भरपाई कोट्यवधी रुपये मोजूनही होत नाही, याचा विचार केला जाणार की नाही? या अशा घटनांतून आपण धडा घेणार की नाही?
rahul.khaladkar@expressindia.com