लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतरही पुण्यात न फिरकलेले पालकमंत्री अजित पवार यांना विरोधकांनी कोंडीत पकडण्यास सुरुवात केली असून, या अपघातावरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. अपघातातील दोषींना वाचविण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणाने राजकीय वळण घेतल्याचे स्पष्ट झाले असून, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

शहरातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दोन युवा संगणक अभियंत्यांना जीव गमवावा लागला होता. कल्याणीनगर येथे रविवारी पहाटे झालेल्या या प्रकाराने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तालयात तळ ठोकून संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन पोलिसांना सूचनाही दिलेल्या असताना, दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र घटना घडून पाच दिवस उलटून गेले, तरी पुण्यात का आले नाहीत, अशी चर्चा सुरू झाली होती. त्या बाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ‘पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा’ या शीर्षकाखाली गुरुवारी दिले.

आणखी वाचा-Pune Accident Case : अल्पवयीनाच्या आजोबाची गुन्हे शाखेकडून चौकशी

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी या प्रकरणात सुप्रिया सुळे गप्प का आहेत, अशी विचारणा केली. पवार आणि अगरवाल कुटुंबीयांचे आर्थिक संबंध आहेत का, त्यामुळे सुळे या संदर्भात काही भाष्य करत नाहीत असा आरोप राणे यांनी केला, तर सुप्रिया सुळे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तपास प्रक्रियेवर शंका उपस्थित करताना राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. मोटार अपघात प्रकरणात राजकीय दबाव टाकला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र, कोण दबाव टाकत आहे, हे त्यांनी जाहीर करावे. सत्तेत असलेले लोकच राजकीय दबाव आणू शकतात. पुणे शहरात आणि जिल्ह्यातील उजनी धरणात दुर्घटना घडल्यानंतरही पालकमंत्री दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. अपघाताची घटना गंभीर असतानाही १५ तासांत आरोपीची सुटका होऊ शकते हे अनाकलनीय आहे. त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे पोलिसांवर कोणाचा दबाव होता का, ज्यामुळे आरोपी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरोपीची वैद्यकीय चाचणी का केली नाही, तातडीने न्यायालयात हजर करून जामीन मिळावा याची तजवीज केली होती का, अपघातानंतर सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस ठाण्यात होता; त्या आमदाराची या प्रकरणात नेमकी भूमिका काय, कारचालक मुलाच्या वडिलांचे कुख्यात माफियाशी संबंध असल्याचे पुढे येत असतानाच फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयात दाखल होण्याची तत्परता का दाखविली, या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री मात्र कोठेच का दिसत नाहीत, अशी विचारणा पटोले यांनी केली आहे.

आणखी वाचा-Pune Accident Case : बालसुधारगृहात अल्पवयीनाला साधा आहार

आरोप-प्रत्यारोप

कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणावरून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनीही उडी घेतली आहे. ‘अपघात झाला तो दुर्दैवीच होता; नाइट लाइफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला काही अटींच्या आधारे काही तासांत जामीन मंजूर झाला. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला. अपघातावेळी अल्पवयीन मुलगा दारू प्यायला होता, हे न्यायालयाला पटवून देण्यात पुणे पोलिसांना यश आले. त्यानंतर न्यायालयाने जुना निर्णय बदलून, अल्पवयीनाला १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर मोरे यांनी समाजमाध्यमावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.