पुणे : ‘खराडी पार्टी प्रकरणात पोलिसांनी केलेली कारवाई एकतर्फी आणि विशिष्ट हेतू ठेवून केली आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. ‘एका घरात पाच ते सहा जण बसले असतील, तर त्याला रेव्ह पार्टी म्हणायचे का?’ असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
खराडी पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सात जणांना नुकतीच अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई डाॅ. प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे. डाॅ. खेवलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. डाॅ. खेवलकर यांची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्ष राेहिणी खडसे यांनी सोमवारी रात्री गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर एकनाथ खडसे मंगळवारी पुण्यात आले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘रेव्ह पार्टी संबोधून विनाकारण बदनाम करण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलिसांनी केलेली कारवाई माध्यमांतून समोर आली आहे. पोलिसांनी एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनातील छायाचित्रे प्रसारित केली आहेत. बदनामी करण्याच्या हेतूनेच हे कृत्य पोलिसांनी केले. पोलिसांना चेहरे दाखविण्याचे अधिकार नाहीत. विशेषत: महिलांची ओळख पटू न देण्याची विशेष काळजी घेण्याची गरज होती. मात्र, पोलिसांनी सर्वांचे चेहरे माध्यमांत प्रसारित करून बदनामी केली,’ असे खडसे म्हणाले.
‘डॉ. प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध यापूर्वी एकही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांना या गुन्ह्यात पहिल्या क्रमांकाचा आरोपी म्हणून गाेवले आहे. अमली पदार्थ ज्या महिलेच्या पर्समध्ये सापडले, तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करणे अपेक्षित होते. इतरांनी अमली पदार्थ बाळगले नव्हते. त्यामुळे त्यांना साक्षीदार करणे गरजेचे होते. वारंवार प्रांजल खेवलकरांचे नाव गोवणे, एकनाथ खडसे यांचे नाव घेणे हे खडसे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केलेले कृत्य आहे,’ असा आरोप खडसे यांनी केला.
प्रसारमाध्यमांपर्यत अहवाल आला कसा?
‘पार्टीत दोघांनी मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालात उघडकीस आले. ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल पोलिसांकडे दिला जातो. मात्र, तो अहवाल प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचला कसा,’ असाही प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. ‘अमली पदार्थ सेवन केले किंवा नाही, याबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. या अहवालात फेरफार किंवा काही गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. ससूनमध्ये यापूर्वी अहवाल बदलण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढा याचे नाव आहे. या प्रकरणात गिरीश महाजन यांचे नाव समोर आले आहे. अशा परिस्थितीत सरकार समोर येऊन जनतेला माहिती का देत नाही,’ असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला.