पुणे : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि इतर प्रमुख सरकारी रुग्णालयांतील बाह्य रूग्ण विभाग राम मंदिर उद्धाटनानिमित्त उद्या (सोमवारी) दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यावर टीका झाल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. असे असले तरी देशभरातील डॉक्टरांनी या निर्णयावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
अलायन्स ऑफ डॉक्टर्स फॉर इथिकल हेल्थकेअर (एडीईएच) या देशातील आघाडीच्या डॉक्टरांच्या संघटनेने सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका घेतली. संघटनेने म्हटले आहे की, राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त २२ जानेवारीला रुग्णालये बंद ठेवण्याची सूचना केंद्र सरकारने केली होती. एखादे रुग्णालय अचानक बंद करण्यात येते त्यावेळी रुगणांची मोठी गैरसोय होते. वैद्यकीय सेवा ही मानवतावादी हेतूने केली जाते. केंद्र सरकारने अशा प्रकारचे निर्देश देणे वैद्यकीय नीतीमूल्यांच्या विरोधात आहे. व्यक्तिगत पातळीवर एखादा व्यक्ती सुटी घेऊन अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतो.
हेही वाचा >>>पौष्टिक तृणधान्यांची निर्यात वाढली! कोणत्या देशांना झाली सर्वाधिक निर्यात?
डॉ.अरूण गद्रे, डॉ.अरूण मित्रा, डॉ.बाबू के.व्ही., डॉ.शकील उर रेहमान, डॉ.अभय शुक्ला, डॉ.जेकब जॉन, डॉ.जे.अमलोरपावानंदन, डॉ.जी.एस.ग्रेवाल, डॉ.जॉर्ज थॉमस, डॉ.संतोष करमरकर, डॉ.मोनिका थॉमस, डॉ.संजीव मुखोपाध्याय, डॉ.जमिला कोशी, डॉ.साजू हमीद, डॉ.शक्तीकुमार प्रभाकर, डॉ.सीमा आलम, डॉ. अनंत फडके आणि डॉ.शारदा बापट या देशभरातील आघाडीच्या डॉक्टरांनी सरकारचे कान टोचले आहेत.
धार्मिक कार्यक्रमाल ऐच्छिक सुटी ठेवा
सरकारने राम मंदिर उद्घाटनानिमित्त रुग्णालये बंद ठेवण्यास सांगू नये. रुग्णालयांना त्यांचे दैनंदिन काम सुरळीतपणे करू द्या. रुग्णांसाठी ही वैद्यकीय सेवा सुरू असते. याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांसाठी सरसकट सुटी जाहीर करण्याऐवजी ऐच्छिक सुटीचा पर्याय द्यावा, असेही एडीईएचने नमूद केले आहे.