पुणे : राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांतील प्रवेश रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अंतिम दिनांकापूर्वी प्रवेश रद्द केल्यास संस्थेने एक हजार रुपये प्रक्रिया शुल्क वजा करून पूर्ण शुल्क परत करायचे असून, कागदपत्रे दोन दिवसांत परत करायची आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी, एकात्मिक किंवा द्वि-पदवी तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२५चे राजपत्र नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, ‘अंतिम दिनांकानंतर प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षा ठेव आणि अनामत ठेव वगळता कोणतेही शुल्क परत मिळणार नाही. अंतिम दिनांकानंतर ऑनलाइन दुवा निष्क्रिय केला जाणार असून, उमेदवाराला संस्थेकडे अर्ज करावा लागणार आहे.’
राजपत्रात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया, चार फेऱ्यांचे आयोजन, सहयोगी (ट्विनिंग) अभ्यासक्रम प्रवेशाच्या नियमांचाही समावेश करण्यात आला आहे. सहयोगी पद्धतीने पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी, दुहेरी पदवी, एकात्मिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाची पात्रता, संबंधित व्यावसायिक पदवीपूर्व पदवी, पदव्युत्तर पदवी, दुहेरी पदवी, एकात्मिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश पात्रतेसारखीच असेल आणि ती यथोचित प्राधिकरणाने वेळोवेळी निश्चित केलेल्या अतिरिक्त निकषांनुसार असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संस्था स्तरावरील प्रवेशात केंद्रीभूत फेऱ्यांनंतर रिक्त जागांवर संस्थांकडून पारदर्शक पद्धतीने प्रवेश दिला जाईल. अंतिम कॅप फेरीच्या जागावाटपाच्या दिनांकापर्यंत अर्ज मागवले जातील. उमेदवार संस्थेकडे थेट अर्ज करू शकत नसल्यास सक्षम प्राधिकरणाच्या वेबसाइटद्वारे अंतिम कॅप फेरीच्या वाटपाच्या दिनांकापर्यंत अर्ज करण्याची संधी असेल. हे अर्ज चौथ्या केंद्रीभूत फेरीनंतर संबंधित संस्थांना पाठवले जातील आणि संस्था गुणवत्ता यादी तयार करताना त्यांचा विचार करतील. प्रवेश रद्द करण्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. प्रणालीद्वारे उपलब्ध झालेल्या अर्जाची स्वाक्षरी केलेली प्रत संस्थेकडे जमा करावी लागेल. ऑनलाइन विनंती सादर केल्यावर प्रवेश रद्द झाल्याचे मानले जाईल. सक्षम प्राधिकरणाने निश्चित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वी प्रवेश रद्द केल्यास संस्थेने एक हजार रुपये प्रक्रिया शुल्क वजा करून पूर्ण शुल्क परत करावे आणि मूळ कागदपत्रे दोन दिवसांत परत करावीत.