पुणे : राज्य सेवेच्या ‘गट अ’ मधील १६१ अधिकाऱ्यांना औंध येथे लष्करी प्रशिक्षण देण्यात आले. अधिकाऱ्यांचे नेतृत्त्व आणि आपत्ती व्यवस्थापन कौशल्ये वाढवण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम राबवण्यात आला.
संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. ४ ते १० जून या कालावधीत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित असलेल्या औंध येथील सैन्य-नागरी संलग्न प्रशिक्षण केंद्रात ‘भारतीय लष्कर’ आणि ‘यशदा अकादमी’ यांच्या सहकार्याने या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभ्यासक्रमात उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक पोलीस, राज्य कर सहायक आयुक्त आणि विकास अधिकारी अशा वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यांचा समावेश होता. नेतृत्व, आंतरसेवा समन्वय, आपत्ती व्यवस्थापन कौशल्ये वाढवणे, ताणतणावाच्या परिस्थितीत प्रभावी निर्णय क्षमता तयार करणे हा या अभ्यासक्रमाच्या आयोजनाचा उद्देश होता.
अभ्यासक्रमात अधिकाऱ्यांनी शस्त्रास्त्र हाताळणीसह क्षेत्र प्रशिक्षण, जंगलात टिकून राहणे अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. त्यात सांघिक कार्य, धोरणात्मक समस्यांची सोडवणूक अशा घटकांचाही समावेश होता. सामरिक प्रशिक्षणाव्यतिरिक्त अधिकाऱ्यांनी वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या माध्यमातून लोकसेवेत प्रभावी योगदान देण्यासाठीचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. लष्कर, नागरी संबंध मजबूत करणे, राज्याच्या क्षमतावृद्धी आणि शाश्वत विकासासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.